‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:46 IST2019-02-19T22:45:56+5:302019-02-19T22:46:20+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि वॉर्डावॉर्डात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि वॉर्डावॉर्डात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. चंद्रपुरातील पटेल हॉयस्कूलजवळील शिवाजी चौकात अनेक संघटनांनी येऊन शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यासोबत चंद्रपुरातील विविध संघटनांनी शोभायात्रा, रॅली काढली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर चंद्रपुरातील रस्त्यावरून ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा गजर ऐकू येत होता. दरम्यान, चंद्रपुरातील श्यामनगर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राजेश मून, नगरसेविका जयश्री जुमडे, राजेंद्र तिवारी, विनोद शेरकी, प्रा. रवी जोगी, अॅड. सारिका संदूरकर, शशीकांत मस्की, डॉ. मनोज कुपरने, सोमेश्वर राऊत, रामभाऊ ढगे, महेंद्र जुमडे, दिनकर सोमलकर, श्रीनिवास मेकल यांच्यासह अनेक मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती लाभली होती.
आपल्या भाषणात ना. अहीर म्हणाले, शिवरायांनी असामान्य शौर्य व कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली व मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त केले. मात्र यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांनी स्वराज्य रक्षणार्थ जे शौर्य गाजवले, त्या इतिहासाचे स्मरण देशवासीयांना असल्याने या शौर्याचा इतिहास आमच्या शुरवीर सैन्यांच्याही हृदय सिंहासनावर कोरला गेला आहे. त्यामुळे राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपले शीर तळहातावर घेऊन मुघलांची औलाद असलेल्या आतंकवाद्यांशी वर्षांनुवर्षे लढावे लागत आहे. यात अनेकांना वीरमरण आले असले तरी पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्यात ज्या ४२ जवानांनी शहीदत्व पत्करले, त्यांचे बलीदान व्यर्थ जावु न देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्याची परिनिती देशवासीयांना लवकरच बघायला मिळेल, असा दृढविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवरांनी प्रसंगोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांनी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून शिवजयंती उत्सव साजरा केला. यावेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते.