म्हणे, कामगारांच्या श्रमपरिहारासाठी दारू हवी!
By Admin | Updated: December 24, 2014 22:56 IST2014-12-24T22:56:53+5:302014-12-24T22:56:53+5:30
चंद्रपूर जिल्हा औद्यागिक असल्याने येथे कामगारांची संख्या अधिक आहे. या कामगारांच्या शारीरिक श्रमपरिहारासाठी मद्यपान आवश्यक असल्याने दारूबंदी नकोच, असे म्हणत आता मद्यविक्रेत्यांची लॉबी

म्हणे, कामगारांच्या श्रमपरिहारासाठी दारू हवी!
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्यागिक असल्याने येथे कामगारांची संख्या अधिक आहे. या कामगारांच्या शारीरिक श्रमपरिहारासाठी मद्यपान आवश्यक असल्याने दारूबंदी नकोच, असे म्हणत आता मद्यविक्रेत्यांची लॉबी आपला मुद्दा मंत्रीस्तरावर पटवून देत आहेत. प्रत्यक्षात हा प्रकार म्हणजे, जिल्ह्यातील कामगार दारूडे असल्याचे भासविण्याचा असल्याने ही तर कामगारांची बदनामीच असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीनुसार, वर्षाला सव्वादोन कोटी बल्क लिटर दारू चंद्रपूर जिल्ह्यात विकली जाते. जिल्ह्यात मद्यविक्रीच्या ५४४ अनुज्ञप्ती आहेत. यात, २९६ बार आणि ११० देशी दारूची दुकानांचा समावेश आहे. येथील मद्यव्यापार मजूर वर्गाशी निगडित असल्याचे जिल्हा दारूबंदी अध्ययन समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. एवढेच नाही तर, मजूर वर्गात देशी दारूची आणि शहरी भागात विदेशी बिअर आणि देशी मद्याची विक्री अधिक असल्याचे मतही या अहवालात नोंदविण्यात आले आहे. मात्र, केवळ औद्यागिक जिल्हा असल्याचे कारण पुढे करून कामागारांना दारू महत्वाची कशी आहे, हे सांगत मद्यविक्रेत्यांच्या लॉबीने दारूबंदीविरोधात लॉबिंग सुरु केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)