वीजचोरी रोखण्यासाठी इन्फ्रारेड मीटर
By Admin | Updated: June 25, 2015 01:09 IST2015-06-25T01:09:14+5:302015-06-25T01:09:14+5:30
वीज वितरण कंपनीने आता विद्युत ग्राहकांच्या घरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू केली आहे.

वीजचोरी रोखण्यासाठी इन्फ्रारेड मीटर
चंद्रपूर : वीज वितरण कंपनीने आता विद्युत ग्राहकांच्या घरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू केली आहे. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी वीज चोरी सुरूच आहे. त्यामुळे हा प्रयोग करण्यात येणार आहे.
चंद्रपूर विभागात २ लाख ३१ हजार ३५६ विद्युत ग्राहक आहेत. त्यापैकी ४४ हजार ७०३ ग्राहकांच्या घरी आतापर्यंत इन्फ्रारेड मीटर लावण्यात आले आहे. महावितरण कंपनी अस्तित्वात येण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने कारभार चालविला जात होता. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने विद्युत ग्राहकांच्या घरी चुंबकीय तत्त्वावर आधारित वीज मीटर लावण्यात आले होते. या वीज मिटरमध्ये असलेली चक्री विशिष्ट वेळ फिरल्यानंतर १ एक एक युनिट वीज वापरल्याचे समजत होते. त्यानुसार ग्राहकांना वीज बिल दिले जात होते.
मात्र, यांत्रिकी पद्धतीचा या वीज मीटरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले होते. विद्युत मंडळाचे सील लावले जात असले, तरी ग्राहक अनेक क्लृप्त्या करुन वीज मीटरमध्ये हेराफेरी करीत होते. कालांतराने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पारेषण कंपनी व अन्य एका कंपनीमध्ये विभाजन झाल्यानंतर जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी महावितरणने जुने मीटर काढून नवीन पारदर्शक मीटर लावले आहेत.
या मीटरमध्येसुद्धा हेराफेरी होत असल्याचे महावितरण कंपनीच्या निदर्शनास आले. त्यानंतर रिडींग घेण्यासाठी फोटो पद्धती अंमलात आणली. मात्र यावरही वीज चोरीचे प्रमाण थांबले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने आता इन्फ्रारेड मीटर लावण्याचा निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)