सदस्यांच्या नवनवीन प्रयोगामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ
By Admin | Updated: October 10, 2015 00:18 IST2015-10-10T00:18:09+5:302015-10-10T00:18:09+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतीने आपले उत्पन्न ...

सदस्यांच्या नवनवीन प्रयोगामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ
पाटण ग्रामपंचायत : ३० टक्के पदाधिकारी युवा
पाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतीने आपले उत्पन्न वाढीसाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे इतर ग्रामपंचायतीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे.
पाटण ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९ सदस्य आहेत. त्यातील ६० टक्के युवक पदाधिकारी असल्याने त्यांनी आपल्या विचारातून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्न कसे वाढविता येईल, यासाठी धडपड करून नवीन इमारत बांधून ती बँकेला भाड्याने दिले व इतर पाच इमारती शाळा व राहण्यासाठी भाड्याने दिले. यातून ८० हजार रुपये उत्पन्न येत असून बाजार लिलाव १ लाख २० हजार रूपये, पाणी कर व गृह कर २ लाख २५ हजार व २०१४-१५ चे तंटामुक्त समितीला तीन लाखाचे पुरस्कार मिळाले. या उत्पन्नातून ग्रामपंचायतीचे नोकरदार यांचे पगार, ग्रामपंचायत किरकोळ काम, इमारत देखभाल दुरुस्ती, १० टक्के रक्कम महिला व बालकल्याण, २० टक्के रक्कम मागासवर्गीय खर्च, नाली सफाई कार्यालयीन खर्च, आरोग्य स्वच्छता अशा कामांसाठी खर्च करण्यात येत आहे.
नुकतेच ग्रामपंचायत इमारतीची रंगरंगोटी व डिजीटल ग्रामपंचायत करण्यात आली. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा गावे आहेत. सितागुडा, लचमागुडा, जनकापूर, पंडीतगुडा, पाटागुडा आणि पाटण या सहा गावांची लोकसंख्या २ हजार ३०० एवढी आहे. ग्राम विकास अधिकारी येरमे व सरपंच सीताराम मडावी यांच्या सहकार्याने ही सर्व कामे पार पाडली जात असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे.
ग्रामपंचायतीने लचमागुडा वासीयांना १०० टक्के घरकूल मिळवून दिले असून पिण्याच्या पाण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करुन पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे. ग्रामपंचायतीतर्फे बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेसाठी गेल्या वर्षी व या वर्षी ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. विविध योजनातून सिमेंट काँक्रीट रस्ते, नळ योजनेद्वार पाण्याची सोय उपलब्ध करून गावकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे गाव विकासाच्या वाटेवर आहे. (वार्ताहर)