प्रसाधनगृह नसल्याने नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:33 IST2021-09-04T04:33:27+5:302021-09-04T04:33:27+5:30

भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अप्पर तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु शहरात अनेक ठिकाणी प्रसाधनगृहेच नसल्याने ...

Inconvenience to citizens due to lack of toilets | प्रसाधनगृह नसल्याने नागरिकांची गैरसोय

प्रसाधनगृह नसल्याने नागरिकांची गैरसोय

भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अप्पर तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु शहरात अनेक ठिकाणी प्रसाधनगृहेच नसल्याने व्यापारी वर्गाची व नागरिकांची गैरसोय होत आहे. बाहेरगावातील नागरिकांना खुल्या जागेवरच लघुशंकेसाठी जावे लागते. भिसीत शनिवारी बाजार भरतो. बाजारासाठी १५-२० गावांतून नागरिक भिसीला येतात. बाजार चौकात कुठेच प्रसाधनगृह नसल्याने बाहेरील नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. जिथे जागा मिळेल, तिथे लघुशंका आटोपली जाते. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.

वडगावच्या नाल्या केव्हा वाहत्या होणार

चंद्रपूर : शहरालगतचे वडगाव हे गाव आता महानगरपालिकेत समाविष्ट आहे. या गावातील नाल्या मात्र वाहत नाही. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.

सॅनिटायझरची विक्री घटली

चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. अनेकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे सुमारे ६० टक्के सॅनिटायझरची विक्री घटली असल्याची माहिती आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा

भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.

पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. यापूर्वी अनेकदा याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

जिवती : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही.

दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही.

Web Title: Inconvenience to citizens due to lack of toilets