दोन एकर शेतात मिश्र पिके घेऊन लाखोंचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:09+5:302021-02-05T07:35:09+5:30
पारंपरिक पिकांना फाटा : फळे, फुले, भाजीपाल्यांची लागवड वरोरा : पारंपारिक पिकाला फाटा देत वरोरा शहरानजीकच्या चिनोरा गावातील एका ...

दोन एकर शेतात मिश्र पिके घेऊन लाखोंचे उत्पन्न
पारंपरिक पिकांना फाटा : फळे, फुले, भाजीपाल्यांची लागवड
वरोरा : पारंपारिक पिकाला फाटा देत वरोरा शहरानजीकच्या चिनोरा गावातील एका शेतकऱ्याने दोन एकर शेतात मागील काही वर्षांपासून मिश्र पिके घेणे सुरू केले. या दोन एकर शेतात त्या शेतकऱ्याला वर्षाकाठी लाखो रुपयांचा नफा मिळत आहे.
वरोरा शहरालगतच्या चिनोरा गावातील पांडुरंग डोंगरकर यांची औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दोन एकर शेती आहे. पूर्वी ते शेतात सोयाबीन व कपाशीचे पीक घेत होते. कधी सोयाबीन, तर कधी कपाशीने धोका दिल्याने अनेकदा लागवडीचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे त्यांनी कृषी विभागाच्या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत फळझाडांची लागवड केली. सध्या पेरूला वर्षभरात दोनदा फळधारणा होत असल्याने पेरूचे उत्पादन चांगल्या प्रकारे होत आहे. यासोबत दहा प्रकारची फळझाडे लावली. त्यात बोर, चिकू, सीताफळ, डाळींब, आवळा, आदी फळांचा समावेश आहे. उर्वरित जागेत नर्सरी असून, इतर जागेत ते बारमाही भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. जनावरांकरिता हिरवा चारा, कुक्कुट पालन, शेळीपालन त्यांनी केले आहे.
मागील काही वर्षांपासून शेतात मिश्र पिकाचा प्रयोग केल्याने त्याचा मोठा फायदा झाल्याचे शेतकरी पांडुरंग डोंगरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विजय काळे उपस्थित होते.
बॉक्स
शेतात सफरचंदाची झाडे
पांडुरंग डोंगरकार यांनी याच शेतात प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षापूर्वी दोन सफरचंदाची झाडे लावली. आपल्याकडील ४७ अंश तापमानात ती झाडे टिकली असून, दीड वर्षानंतर त्याला फळे येतील. हिमाचल प्रदेशातील सफरचंद निघण्याच्या दोन महिन्यांपूर्वी या झाडाचे सफरचंद पूर्ण विकसित होईल. त्यामुळे दर चांगला मिळणार आहे. ही दोन झाडे टिकली म्हणून त्यांनी वाशिम परिसरातून ५० सफरचंदाची झाडे मागविली आहेत.
बॉक्स
शेतातील एक इंचही जागा सोडली नाही
शेतातील विहिरीमधील पाणी ठिबक सिंचन पद्धतीने पिकांना देत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असते. भाजीपाला व फळे वरोरा शहर परिसरातील गावात किरकोळ पद्धतीने विकत असल्याने त्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यात दोन एकर शेतात फुलांचे उत्पादनही घेतले जाते. व्यापारी शेतात येऊन फुले विकत घेऊन जातात. दोन एकर शेतातील एकही इंच जागा ते सोडत नाहीत. प्रत्येक जागेवर उत्पादन घेत आहेत, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.