विहीरगाव येथे उभारले मोबाईलचे अवैध टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:04 IST2018-05-21T23:04:50+5:302018-05-21T23:04:50+5:30
विहीरगाव येथे २००९ पासून बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरू आहे. मागील एक वर्षापासून विविध खासगी कंपन्यांनी अनेक ठिकाणी अवैध टॉवर उभारूनही संंबंधित विभागाने अद्याप कारवाई केली नाही.

विहीरगाव येथे उभारले मोबाईलचे अवैध टॉवर
लोकमत न्यूज नेटवर्क
विहिरगाव : विहीरगाव येथे २००९ पासून बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरू आहे. मागील एक वर्षापासून विविध खासगी कंपन्यांनी अनेक ठिकाणी अवैध टॉवर उभारूनही संंबंधित विभागाने अद्याप कारवाई केली नाही.
खासगी कंपन्यांनी टॉवर उभारणी करीत असताना ग्रामपंचायतकडून परवानगी घेतली नाही. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रारही दाखल केली. ग्रामपंचायतमध्ये नोंदणी अथवा शुल्क भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उभारणी केलेल्या टॉवरची कुठेच नोंद नाही. टॉवर उभारण्यासाठी शासनाने संबंधित कंपन्यांना नियम लागू केले आहेत. केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून टॉवर कंपन्यांवर नियंत्रण ठेवले जाते. पण, परिसरातील टॉवरची नोंद नसून शासन व ग्रामपंचायतचा कर बुडत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा टॉवरची माहिती घेवून कंपन्यांवर कारवाईच बडगा उगारावा, अशी मागणी केली जात आहे. ग्रामपंचायतमध्ये टॉवरची नोंद नसल्याने कर बुडत आहे. हा प्रकार तातडीने थांबविण्यास ग्रामपंचायत व शासनाच्या उत्पन्नात भर पडू शकते.