अवैध दारूविक्रेतेच घडवू शकतात मालवणीची पुनरावृत्ती
By Admin | Updated: June 25, 2015 01:15 IST2015-06-25T01:15:13+5:302015-06-25T01:15:13+5:30
विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

अवैध दारूविक्रेतेच घडवू शकतात मालवणीची पुनरावृत्ती
चंद्रपूर : विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. परंतु, अवैध दारुविक्रेत्यांकडून विषारी दारुची विक्री करून चंद्रपुरातही मालवणीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारुमुक्ती अभियानाच्या संयोजिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली.
मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा विषारी दारु प्राशन केल्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, संपूर्ण राज्यात दारुबंदी करण्याची मागणी होत आहे. महिलांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू केली. दारुबंदी लागू करण्यापूर्वी आणि प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर शासनाने बंदी मागे घ्यावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा दारु असोसिएशनचे सल्लागार आणि त्या व्यवसायातील त्यांच्या साथीदारांनी जोरदार प्रयत्न करीत आहेत.
मात्र, न्यायालयात आणि शासनदरबारी त्यांना अपयश आले. जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बनावट दारु दाखविली होती. तसेच अशाप्रकारच्या दारुचा पुरवठा होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या बनावट दारुमुळे नागरिकांना मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे कारण देत दारुबंदी हटविण्याची मागणी त्यांनी केली होती.
आता मालवणीच्या घटनेनंतर येथील दारुविक्रेते चंद्रपुरातही विषारी दारुचा पुरवठा करुन नागरिकांच्या जिवाशी खेळू शकतात. यात एखाद्याच्या मृत्यूनंतर ते शासनाने बंदी उठविण्याबाबत मागणी करु शकतात, असेही गोस्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे.
वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी काळात विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याची अजूनपर्यंत एकही घटना घडली नाही. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्रेते बनावट दारुमुळे नागरिकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करीत आहेत. हा प्रकार गंभीर आहे. यासाठी भविष्यात दारु विक्रेते मोठे षडयंत्र घडवू शकतात. त्यामुळे पोलीस विभागाने याचे गांभीर्य लक्षाय घेता दारूची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे गोस्वामी यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)