चिमूर परिसरात रेतीचे अवैध उत्खनन
By Admin | Updated: March 10, 2016 01:23 IST2016-03-10T01:23:27+5:302016-03-10T01:23:27+5:30
चिमूर तालुक्यातील शिवरा ते मांगलगाव रस्त्याच्या लगत मुरुम उत्खनन व नाल्यातून रेती उत्खनन करून वाहतूक करणे

चिमूर परिसरात रेतीचे अवैध उत्खनन
ट्रॅक्टर जप्त : वाहनमालकाला पकडून कारवाई करा
चिमूर : चिमूर तालुक्यातील शिवरा ते मांगलगाव रस्त्याच्या लगत मुरुम उत्खनन व नाल्यातून रेती उत्खनन करून वाहतूक करणे यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास सुरु होते. परंतु शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विलास डांगे व त्यांचे सहकारी यांच्या जागृकतेने शिवरा परिसरात अवैध रेती, मुरुम उत्खनन करताना पकडले. तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. पळून गेलेल्या वाहनांना पकडून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास डांगे व तालुका प्रमुख धरमसींह वर्मा यांनी केली आहे.
६ मार्चला रात्रीच्या सुमारास शिवरा ते मांगलगाव या रस्त्याच्या लगतच्या वनविभागाच्या जागेतून अवैधरित्या मुरुम उत्खनन तसेच नाल्यातून रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांना लागली. शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास डांगे यांना बोलाविण्यात आल्यावर रेती व मुरुम भरलेले वाहन अडविण्यात आले. तहसील प्रशासनाकडून नायब तहसीलदार राजमाने, तलाठी मडावी, तलाठी नागापूरे आले. यावेळी जेसीपी, दोन ट्रक, तीन ट्रॅक्टर होते. परंतु या वाहनांना तहसील अधिकाऱ्यांनी आर्थिक चिरीमिरी घेऊन पळवून लावून त्यांची सुटका करण्यास मदत केल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. त्यानंतर ट्रॅक्टर एमएच ४० ए- ४८४२ हा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. शिवरामधील घटना असल्याने भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. वनविभागाच्या जागेतून १५०० ब्रास मुरुम तर १००० ब्रास रेतीची चोरी झाली असून अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने लाखो रुपयांचा महसूल बूडविला आहे. शिवरा येथील रेती व मुरुम उत्खननाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना भ्रमणध्वनीवरुन सूचना करुनही दिरंगाई केली. जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. उत्खनन वनविभागाच्या जागेत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यावरही दुर्लक्ष करण्यात आले. अवैध खनिज भरुन असलेले वाहन व त्यांच्या मालकांना पकडून फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच खनिज वाहन पळवून लावलेल्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विलास डांगे यांनी केली आहे.