ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 25, 2015 01:31 IST2015-04-25T01:31:58+5:302015-04-25T01:31:58+5:30
गावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो.

ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
कोठारी: गावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. त्यासाठी गावकरी मतदानाचा हक्क बजावून कर्तुत्ववान पदाधिकाऱ्यांची निवड करुन आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतीत पाठवितात. मात्र निवडून जाणारा प्रतिनिधी नागरिकांच्या समस्या, गावाच्या समस्या व गाव विकास करण्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:ची दैनंदिन समस्या सोडविण्यात मश्गुल असल्याचे चित्र कोठारी गावात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत मोठी मानली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये पाच वॉर्ड असून १३ सदस्य निवडून पाठविले जातात. पाच हजार मतदार असून गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या वर आहे. चंद्रपूर- आल्लापली या मुख्य मार्गावर गाव वसले असून गावाची सीमा दिवसेंदिवस वाढत आहे. गावाच्या समस्या निकाली काढण्यासाठी पदाधिकारी कार्यरत आहेत. गावात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारे चिखलाने तुडूंब भरलेले आहेत. सांडपाणी गावातील सिमेंट रस्त्यावरुन दिवसरात्र वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त आहेत. नाल्या सफाई करण्यासाठी वेळावेळी पदाधिकाऱ्यांना तक्रारीद्वारे, सांगितले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावात जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. श्रीमतांनी घरोघरी बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था केली. मात्र गोरगरिबांना हातपंपाशिवाय पर्याय नाही. उन्हाळ्यात हातपंपाचे पाणी खोल गेले आहे. पाण्यासाठी महिलांना प्रचंड श्रम करावा लागतो आहे. कोठारीची पाणी पुरवठा योजना बंद असल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिला रात्रंदिवस जागल करीत पाण्याची पूर्तता करीत आहेत. अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. सुरु असलेल्या हातपंपावरुन मुबलक पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलांची होणारी होरपळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना का दिसत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गावात वीज वितरण कंपनीचे ३३ केव्ही केंद्र असून वीज वेळोवेळी खंडित होत असते. सदैव विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त आहेत. त्याकडे कुणी पदाधिकारी जाऊन त्याचा जाब विचारत नाही. वीज कर्मचारी केवळ नामधारी बनून केवळ पगारासाठी उपस्थिती दर्शवित असतात. कधी नव्हे एवढ्या समस्या गावात निर्माण झाल्या असताना त्याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष जावू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
यातूनच त्यांचे कार्य नागरिकांना दिसून येत आहे. गावात निर्माण झालेल्या नागरी समस्या पदाधिकाऱ्यांनी निकाली काढाव्या, अशी मागणी आहे. मात्र स्वत:च्या हितासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. निवडून जाणारा पदाधिकाऱ्यास जनतेच्या समस्यांचा विसर पडला असून केवळ स्वार्थासाठी ग्रामपंचायतीमध्ये सध्या राजकारण केले जात आहे. (वार्ताहर)