सोमनाथ प्रकल्पाकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित
By Admin | Updated: May 17, 2014 00:07 IST2014-05-17T00:07:56+5:302014-05-17T00:07:56+5:30
मागील अनेक वर्षांपासून सोमनाथकडे जाणार्या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यातच राजकीय पुढार्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

सोमनाथ प्रकल्पाकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित
ंमारोडा : मागील अनेक वर्षांपासून सोमनाथकडे जाणार्या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यातच राजकीय पुढार्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कधीकाळी राजकारणी, समाजसेवक, कलावंत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा १३ किमी लांबीचा रस्ता येथील खड्डे,अरुंदपणा व उखळलेली गिट्टीमुळे महत्व कमी करीत आहे. दरवर्षी १५ ते २२ मे या काळात या प्रकल्पात नियमित होणारी श्रमसंस्कार छावणी यावर्षी महाराष्ट्रातील गारपीटग्रस्तांना छावणीचा खर्च मदत म्हणून वळती करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी श्रमसंस्कार शिबिर रद्द करण्यात आले आहे. या रस्त्याचे मोठेपणा आगळेवेगळे आहे. १ मे १९६0 ला महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलाविल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रणी कार्यकर्ते दादासाहेब कन्नमवार यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपविली. त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जाणारा मारोडा परिसर पुलेंकित झाला. त्यांचे सहकारी व ज्येष्ठ समाजवादी नेते बाबुराव चंदावार यांचे मूळ गाव मारोडाच होते. त्यामुळे विकास कामांना गती आली. याशिवाय सोमनाथ डोंगराच्या काट्याकुट्यात कुष्ठरोग्यांना आश्रय देण्याकरिता समाजसेवक बाबा आमटे व त्यांच्या धर्मपत्नी साधनाताई धावून आल्या. पाखरे घरट्यात गेलीत की, केवळ जनावरांची डरकाळी ऐकू येईल. अशी स्थिती येथील होती. परंतु बाबांनी येथे श्रमसंस्कार छावणी सुरु केल्यानंतर देशभरातील युवावर्ग मोठय़ा संख्येने आकर्षिला गेला. त्यामुळे या रस्त्याचे महत्व वाढू लागले. देशभरात प्रकल्पाची किर्ती पोहचली. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पु.ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर, ग. प्र. प्रधान यांची पावले या वाटेवरील धुळीवर उमटू लागली. आचार्य शंकर देव, दादा धर्माधिकारी, यदुनाथ थत्ते, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे विचारवंत, समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी मधु लिमये, जार्ज फर्नांडीस, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, अरुण देशपांडे यांच्यासारखे समाजातील थोर मंडळीनी येथे चिंतन केले. सोमनाथच्या श्रम संस्कार छावणीत व प्रकल्पांत ज्यांचे मन भारावून गेले त्यात देशभरातील हजारो युवकांचा समावेश आहे. त्यांनी येथूनच प्रेरणा घेतली. यात डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. रवी कोल्हे, डॉ. आशिष साठव, डॉ. सतीश गोगुलवार ही साक्ष देतात. सोमनाथ प्रकल्पाच्या माध्यमातून ‘भारत जोडो’ अभियानाचा उगम येथेच झाला. नर्मदा आंदोलनात सहभागी होण्याचा विचार बाबा आमटे यांनी येथेच केला. डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादारीचा जन्माचा स्त्रोत सोमनाथ प्रकल्पातच सापडला. विविध अभियानाच्या कल्पना, संकल्पना येथूनच पुढे आल्या. अशी माहिती कार्यकर्ते अरुण कदम यांनी दिली. राष्ट्रीय सेवा योजना, छात्रभारती, आंतरभारती, पर्यावरण वृक्षदिंडी, पंजाब शांती यात्रा आदींचा यात समावेश आहे. या ठिकाणी श्रमाचे मूल्य वाढविण्याचा बाबांचा मानस होता. श्रमविद्यापीठ स्थापनेची कल्पना होती. श्रमसंस्कार छावणीने काही प्रमाणात पूर्ण झाली. सोमनाथ कुठष्ठरोग्यांचे पूनर्वसन केंद्र बनले. शेतात अद्यावत तंत्रज्ञान वापरुन लोकांना आत्मसन्मानाने रोजगार उपलब्ध करुन व राष्ट्रीय उत्पन्नात वाढीव योगदान देणारी कृषी प्रयोगशाळा बनली. दरवर्षी चालणारी श्रमसंस्कार छावणीने अनेकांना मोठे केले. मात्र सध्या या येथे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)