चंदनखेड्यातील फळवाटिकेकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: June 25, 2015 01:24 IST2015-06-25T01:24:32+5:302015-06-25T01:24:32+5:30
शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे.

चंदनखेड्यातील फळवाटिकेकडे दुर्लक्ष
चंदनखेडा: शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे. परंतु यापूर्वी रोपवन केलेल्या लिंबाच्या फळवाटिकाकडे ग्रामपंचयतीचे पूर्णत: दुर्लक्ष असून ही फळवाटिका लोकासाठी शौचालयाकरिता मोकळे रान ठरली आहे.
अनेक वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत जि.प. शाळा परिसरात असलेल्या जमिनीवर ग्रामपंचायतीमार्फत लिंबाच्या झाडाचे रोपण करुन फळवाटिका तयार करण्यात आली व काही वर्षातच या झाडापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे, यासाठी वार्षिक लिलाव करुन त्यापासून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात येत होते. परंतु वृक्षारोपणासंदर्भात शासनाच्या विविध नवीन योजना व भरपूर निधी येत गेल्याने या फळवाटिकेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत गेले. सदर झाडांना कुठलेही कुंपन व नियंत्रण नसल्याने ही फळवाटिका शौचालयास बाहेर जात असलेल्या व्यक्तीसाठी जणू संरक्षित जागाच झाल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना असो की रोजगार हमी योजना असो, कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचे वृक्षारोपण तथा जतन कार्यक्रम कृषी विभाग, ग्रामपंचायत तसेच वनविभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे. झाडाच्या संगोपनात तनकचरा सफाई, संरक्षण कठडे तसेच उन्हाळ्यात दूरवरुन पाणी आणून पाण्याची व्यवस्था मजुराद्वारा केली जाते. असे असताना काही व्यक्तीकडून शेतशिवारात धुरे पेटविण्यासाठी वनवा लावला जातो. परंतु निष्काळजीपणामुळे आगीवर नियंत्रण करु न शकल्याने शेतालगत रोपन केलेल्या वृक्षाना या आगीत भस्म व्हावे लागत आहे. यात लाखो रुपये पाण्यात जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या फळवाटिकेकडे दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कधी संपणार, यात कधी बदल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)