भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी
By Admin | Updated: April 25, 2016 00:42 IST2016-04-25T00:42:41+5:302016-04-25T00:42:41+5:30
विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत.

भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी
वरिष्ठांनी लक्ष द्यावे : दोन वर्षांपासून अनुदान रखडले
राजुरा : विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत. मात्र या आश्रम शाळांना गत दोन वर्षांपासून अनुदान योग्य पद्धतीने न दिल्यामुळे आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
२०१४ मध्ये विद्यार्थ्यांना ६० टक्के अनुदान देण्यात आले. २०१५ मध्ये मात्र केवळ एक लाखाचे अनुदान देण्यात आले. आता वर्ष संपत आले. परंतु २०१६ चे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नाही. विमुक्त भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र योग्य वेळी अनुदान न दिल्यामुळे आश्रमशाळा चालविणे कठीण होत असल्याचा आरोप, अनंता चटप यांनी केला आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील विमुक्त भटक्या जमातीच्या आश्रमशाळेत वर्ग पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी निवासी राहतात. दुर्गम भागातील मुले- मुली या आश्रमशाळेत शिक्षण घेण्याकरिता येत असतात. परंतु शासन या गरीब मुलाच्या सोई-सवलतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. एका संस्थेचे एक करोडच्यावर अनुदान मिळालेले नाही. शिक्षणाचा झरा शेवटच्या माणसापर्यंत पोहचला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असताना या विभागात कार्यरत अधिकारी मात्र निर्बंध आणत आहे.
ज्याप्रमाणे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेला सातवीनंतर आठ ते दहावीपर्यंत परवानगी दिली. त्याच धर्तीवर विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळांनासुद्धा आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे. आश्रमशाळा वाचविण्यासाठी शासनाने त्वरित अनुदान देण्याची मागणी, अनंता चटप यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)