शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:43 IST2018-11-26T22:42:48+5:302018-11-26T22:43:04+5:30
गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जबरानजोत शेतकऱ्यांना तातडीने सरकारी जमिनीचे पट्टे द्यावे, वनहक्क कायद्यातील इतर पारंपरिक वननिवासी व गैर आदिवासींसाठी असणाऱ्या तीन पिढ्यांची अट रद्द करावी, सर्व शेतमालावरील खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा, साप हा वन्यप्राणी व सुरक्षा कायद्यात समाविष्ट असल्यामुळे साप चावून मृत पावणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी, भंगाराम तळोधी येथील मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तातडीने सुरू करावे, करंजी येथील एमआयडीसीमधील उद्योग सुरू करून स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरीत सामावून घ्यावे, गोंडपिपरी येथे नाफेड व सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू करावे, आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकारी व तहसीलदाराला देण्यात आले. दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहापासून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रभाकर दिवे, अरूण नवले, तूकेश वानोडे, राजेश कवठे, व्यंकटेश मल्लेलवार, प्रफुल्ल आस्वले, भारत खामनकर, सुधीर फुलझेले, अनिल ठाकुरवार, ज्योत्स्ना मोहित्कर, पोर्णिमा निरंजने, सूर्यकांत मुंजेकर आदींसह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.