फ्लोरोसीस आजाराने शेकडो नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:18 IST2018-06-01T01:18:32+5:302018-06-01T01:18:32+5:30

जिल्ह्यातील प्र्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्यात विषारी घटकांचे प्रमाण वाढत असून शेकडो नागरिक फ्लोरोसीसने आजाराने त्रस्त झाले आहेत, असा दावा डॉ. सोनाली ढवस यांनी संशोधनातून केला आहे. हा आजार होवू नये, यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा तयार केली.

Hundreds of civilians suffer from fluorescence | फ्लोरोसीस आजाराने शेकडो नागरिक त्रस्त

फ्लोरोसीस आजाराने शेकडो नागरिक त्रस्त

ठळक मुद्देसोनाली ढवस यांचे संशोधन : चंद्रपूर, वरोरा, जिवती, गोंडपिपरी तालुक्यात व्याधीग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्र्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्यात विषारी घटकांचे प्रमाण वाढत असून शेकडो नागरिक फ्लोरोसीसने आजाराने त्रस्त झाले आहेत, असा दावा डॉ. सोनाली ढवस यांनी संशोधनातून केला आहे. हा आजार होवू नये, यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा तयार केली. मात्र, ही यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नाही. बऱ्याच ठिकाणी उभारण्यात आलेले जलशुद्धीकरणाचे संयंत्र बंदावस्थेत आहेत, याकडेही डॉ. ढवस यांनी लक्ष वेधले आहे. त्या गडचिरोली जिल्ह्यातील जी. सी. पाटील मुनघाटे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून आजाराच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात त्या मागील आठ वर्षांपासून कार्य करीत आहेत.
फ्लोरोसिस या रोगावर अद्याप उपचार नसून बचाव हा एकमेव पर्याय आहे. फ्लोरोसिसच्या बचावाकरिता फ्लोरोसिसग्रस्त भागात फ्लोरोईडमुक्त पाण्याची सोय करणे तसेच लोकांमध्ये रोगाबद्दल जनजागृती निर्माण करणे, हा एकमेव बचावाचा मार्ग आहे. फ्लोरोसिस रुग्णांमधील फ्लोराईडचे प्रमाण कमी करण्यासाठी जीवनसत्त्व व कॉल्शियम या दोन घटकांचा अधिकाधिक वापर करून आजाराची तीव्रता कमी करता येऊ शकते. गरीबी व फ्लोरासिस यांचा निकटचा संबंध असल्याचा दावाही डॉ. सोनाली ढवस यांनी केला. शासनामार्फत ग्रामीण भागात डिफ्लोराईडेशन प्लॉन्ट लावून वेळोवेळी तपासणी करणे आणि ग्रामीण जनतेला फ्लोराईडमुक्त पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होय. फ्लोरोसिस हा हाडे व दातांना होणारा जटिल रोग आहे. त्याचे कारण म्हणजे पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईडचे अतिरिक्त प्रमाण होय. भारतातील विविध २० राज्यांमध्ये फ्लोरोसिस रोग आढळून आला. जिल्ह्यात फ्लोरोसिसचे रुग्ण आढळले असून या रोगाचे प्रमाण प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात वरोरा, धोपताळा, जिवती, गोंडपिपरी, चिमूर येथे सध्या फ्लोरोसिसचे प्रमाण अत्याधिक असून त्याचे एकमेव कारण म्हणजे फ्लोराईड युक्त पाणी होय. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे एकमात्र स्त्रोत म्हणजे विहिर व हातपंप आहे. ज्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण ०.५४ ते ५.९९ एमजी. लि. एवढे आढळले. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या तुलनेत अधिक असून त्याचा गंभीर दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. फ्लोराईडने हाडांवर परिणाम झाल्यास फ्लोरोसिस म्हणतात वरोरा तालुक्यात असे रुग्ण आढळले. या रुग्णांना हाताने कोणतीही कामे करता येत नाही. स्नायू व सांधेदुखीने ग्रस्त आहेत. हात, पाय, खांदे, पाठ व टोंगळे दुखी, हात व पायांच्या बोटांना वाक येणे आदी लक्षणे अस्थिफ्लोरोसिसची लक्षणे आहेत.
आजाराची प्रमुख लक्षणे
फ्लोराईड हे संयुग भूगर्भात आढळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार पिण्याच्या पाण्यातील प्रमाण ०.५ ते १.५ एमजी, लि. एवढे आरोग्यास उपयुक्त आहे. यापेक्षा अधिक प्रमाण आरोग्यास अतिशय घातक असल्याने विज्ञानाच्या भाषेत याला ‘दुधारी तलवार’ असे संबोधले जाते. मानवी शरीराने जर एकदा फ्लोराईड शोषून घेतले तर त्याद्वारे होणारे परिणाम बदलू शकत नाही. या रोगापासून बचाव करणे अतिशय आवश्यक आहे. शरिरात फ्लोराईडचे अतिरिक्त प्रमाण झाल्यास दात व हाडांवर अनिष्ट परिणाम होतो. दातांचा रंग कायमस्वरूपी बदलतो. फ्लोराईड रक्तात वाढल्यास कॅल्शिअमचे प्रमाण कमी होतो. हाडे ढिसूळ बनतात, असा निष्कर्ष डॉ. ढवस यांनी नोंदविला आहे.
आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
फ्लोरोसिसचे प्रमाण जिल्ह्यात सतत वाढत असल्याने तातडीने उपाययोजनेची गरज आहे. पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी करून वापरले पाहिजे. फ्लोरोसिसग्रस्त तालुक्यांमध्ये शासनाने डिफ्लोराईडेशन प्लॉन्टची निर्मिती केली. पण हे संच बंदावस्थेत असल्याचे डॉ. ढवस यांच्या पाहणीतून पुढे आले आहे. फ्लोरोसीस आजार आणि ग्रामीण भागाचा निकटचा संबंध असूनही प्रभावणी उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फ्लोरोसिसचे वाढते प्रमाण जिल्ह्यातील नागरिकांसाठी घातक ठरले असून शारीरिक दोष निर्माण होत आहेत. यकृत, किडणी व रक्तपेशी यावरही गंभीर परिणाम झाला. शरिरातील विकर व संप्रेरकांचे स्त्राव बदलेले. शारिरीक प्रक्रियांमध्ये बिघाड झाल्याने काही रूग्णांची अवयके निकामी होण्याच्या मार्गावर आहेत.

Web Title: Hundreds of civilians suffer from fluorescence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.