जिल्ह्यातील शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे

By Admin | Updated: December 21, 2015 00:54 IST2015-12-21T00:54:12+5:302015-12-21T00:54:12+5:30

यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन..

Hundreds of animals in slaughter house | जिल्ह्यातील शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे

जिल्ह्यातील शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे

शेतकऱ्यांची लूट : तस्करांनी धरलीय कोरपन्याची वाट
चंद्रपूर: यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन कवडीमोल भावात विकत असून जिल्ह्यातील ही जनावरे कोरपनामार्गे आदिलाबादकडे कत्तलखान्यात नेली जात असल्याची माहिती आहे. काही तस्कर कोरपना येथून वणी मार्गे नागपूरकडे ही जनावरे घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे.
गोहत्याबंदी कायदा लागू झाला असला तरी धडधाकट पाळीव जनावरेदेखील कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती आहे. यंदा जिल्ह्यात अतिशय अल्पपाऊस झाला. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाती सरासरी ७० टक्के उत्पादन आले. त्यातच शेतमालाला अल्पभाव मिळत असल्याने शेतीवर झालेला खर्चही त्यातून निघत नाही. त्यामुळे आलेल्या हतबलतेतून शेतकरी अल्प किंमतीत आपली जनावरे कसायांच्या हवाली करीत असल्याचे चित्र आहे.
कोरपना तालुका हा तेलंगाणा व यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यातच हा भाग अतिदुर्गम असल्याने या भागावर कुणाचेही लक्ष जात नाही. याचाच फायदा घेऊन जनावरांचे तस्कर या भागात सक्रीय झाले आहेत. गरजवंत शेतकऱ्यांना हेरायचे आणि अतिशय अल्प किंमतीत त्यांच्याजवळील जनावरे खरेदी करायची असा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या बैलबाजारातही हे तस्कर सक्रीय असून गरजू शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम हे तस्कर करीत आहेत. यातून पशुपालक शेतकरी नागवला जात आहे.
या तस्करांवर पोलिसांची नजर असली तरी अतिशय चतुराईने पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून जनावरांची तस्करी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of animals in slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.