नाल्याचा प्रवाह बदलल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली
By Admin | Updated: June 27, 2015 01:31 IST2015-06-27T01:31:43+5:302015-06-27T01:31:43+5:30
वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला. कोळसा उत्खननासाठी पोवनी ...

नाल्याचा प्रवाह बदलल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली
वेकोलिचा प्रताप : शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले
गोवरी : वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला. कोळसा उत्खननासाठी पोवनी ओपनकास्टमधील मातीचे महाकाय ढिगारे नाल्याच्या किनाऱ्यावर टाकल्याने नाल्याचा प्रवाह बदलला आणि नाल्यातील पाणी शेतात शिरत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलल्याने थोड्या पावसानेदेखील या नाल्याचे पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. वेकोलिने नाला वळविल्याने त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राजुरा तालुक्यातील बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या पोवनी ओपनकास्टने कोळसा खाण तयार करण्यासाठी त्या परिसरात असणाऱ्या नैसर्गिक नाल्याचे प्रवाह बदलले. कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे नाल्याच्या काठावर टाकले. त्यामुळे नाल्याचे पाणी अडून सरळ शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने शेतीचे गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे वेकोलि प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी पै पै जुळवून बियाण्यांची लागवड केली. मात्र, रविवारी झालेल्या संततधार पावसामुळे या प्रवाह बदललेल्या नाल्याचे पाणी परिसरातील शेकडो एकर शेतीत गेल्याने पेरलेले बियाणे उगवण्याआधीच वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पोवनी ओपनकास्ट परिसरात नाल्यांच्या काठावर गोवरी येथील शेतकरी शंकर बोढे, गणपत बोढे, कुसुम बोढे, अरुण पाचभाई, अण्णाजी पाचभाई, किशोर लोहे, मधुकर लोहे, विलास लोहे, प्रभाकर बोढे, सुनील पाचभाई, सुगंधा बोढे, बाळकृष्ण लोहे, तुषार पाचभाई, संजय पिंपळकर, मारोती वडस्कर, प्रभाकर लोहे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. त्यांना दरवर्षीच हा फटका बसतो. परंतु वेकोलि प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. यावर वेकोलिने उपाययोजना करावी, यासाठी गोवरी येथील सरपंच सुनील उरकुडे यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसह वेकोलिचे गोवरी क्षेत्र व्यवस्थापक परिहार, गोवरी खाण व्यवस्थापक नवले यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान, योग्य तोडगा काढल्या जाईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे वेकोलि आता कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)