सागवानाच्या कत्तलीबाबत वन अधिकारी अनभिज्ञ कसे ?
By Admin | Updated: June 9, 2014 23:32 IST2014-06-09T23:32:38+5:302014-06-09T23:32:38+5:30
मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारपूर अंतर्गत झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सागवानाच्या कत्तलीबाबत वन अधिकारी अनभिज्ञ कसे ?
सुरेश रंगारी - कोठारी
मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारपूर अंतर्गत झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून याकडे वनाधिकार्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महामंडळाच्या ३२ हजार हेक्टर वनक्षेत्रात एकूण ३३ बिट असून त्यातील १५ ते २0 बिटात चोरट्यांनी धूमाकुळ घातला आहे. लाखो रुपये किंमतीच्या सागवान वृक्षांची कत्तली करण्यात आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १, २, ८0, ८१, ८२ क्षेत्राचा फेरफटका मारला असता, विदारक चित्र समोर आले. २0 ते २५ वर्षांच्या सागवान रोपवनात जागोजागो मोठमोठय़ा सागवान वृक्षांची कुर्हाडीने, करवतीने कटाई केली आहे. जंगलातच ठिय्या मांडून हाताने कटाई केल्याचे अनेक पुराने ‘लोकमत’ला प्राप्त झाले आहेत. साग वृक्षांची कटाई करून त्याचे वेगवेगळे तुकडे करण्यात आल्याचे तसेच हातकटाई करण्याकरीता लाल रंगाच्या धाग्याने मार्कींग केल्याचे दिसून आले. झरण वनक्षेत्रातील पाच कक्षात २00 ते ३00 साग वृक्षांची कत्तल झाली आहे. असाच प्रकार तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात आहे. या चारही वनक्षेत्रातील बिटाची खास यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. त्यातून खरा प्रकार उघडकीस येईल. यामुळे जंगलाचे संवर्धन व संरक्षणाच्या बाता करणार्या वनविकास महामंडळातील अधिकार्यांच्या कर्तव्यदक्षतेचा बुरखा फाडला जाणार आहे. शासनाच्या जंगलाचे महामंडळाचे अधिकारी खरोखरच संरक्षण करण्यास तत्पर आहेत काय? याचा लेखाजोखा प्रत्यक्षात दिसून येईल. वनाचा विकास करण्याच्या नावाखाली दरवर्षी रोपवन घेण्यात येतात. त्यासाठी उभ्या जंगलाची कत्तल महामंडळाकडून करण्यात येते. या कामात अधिकारी व्यस्त असतात. यात लाखोंची माया जमवून वरिष्ठांना मलिदा वाटला जातो. परिणामी जंगल संरक्षणाकडे त्यांचे लक्ष नसते. जंगलात दिवस-रात्रं चोरट्यांचा वावर असतो. जंगलात हातकटाईचे ठिय्ये असतात.