तोकड्या जागेत कसे बांधावे घरकूल ?
By Admin | Updated: June 11, 2014 23:49 IST2014-06-11T23:49:41+5:302014-06-11T23:49:41+5:30
गडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे,

तोकड्या जागेत कसे बांधावे घरकूल ?
नागरिकांमध्ये संताप : ग्रामपंचायत प्रशासनाने पाडले जागेचे हिस्से
रत्नाकर चटप - लखमापूर
गडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे, घरे कसे उभे करायचे, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.
आगग्रस्तांच्या म्हणण्यानुसार याआधी प्रत्येक कुटुंबाकडे ७०० ते ८०० तर कुणाकडे १००० चौरस फूट जागा होती. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने जागेच्या सीमा राहिल्या नाही. त्याप्रमाणात सर्वांना जुन्या प्लॉटप्रमाणे आता जागा देण्यात यायला हवी होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने तसे न करता कमी जागेचे प्लॉट दिलेले आहे. प्रत्येक कुटुंबात चार ते पाच जण राहतात. यात लहान मुलं आणि वृद्धांचीही संख्या आहे. त्यामुळे कमी जागेत कुटुंबियांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून पुनर्वसनाची अपेक्षा होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासन जखमेवर मीठ चोळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसत आहे. सदर वस्ती अतिक्रमणाखाली असून येथे गेल्या २० वर्षांपासून नागरिक राहतात. हक्काचे घर विकत घेता आले नसल्याने व दारिद्रय अधिक प्रमाणात असल्याने टिनाचे पत्रे आणि लाकडी खांब, ताटवे जमा करून राहण्यापुरत्या झोपड्या नगारिकांनी उभ्या केल्या. या वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांचा अभाव असून पावसाळ्यात चिखल तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात पाणी टंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. घरातील सर्वच सदस्य काही ना काही काम करून पोटाची भाकर शोधतात. एक- एक पैसा जमा करून काहींनी घरी टिव्ही, कुलर, कपाट, भांडी आदी वस्तू खरेदी केल्या. मात्र त्याहीे आगीत जळून खाक झाल्याने पुन्हा संसार कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कुटुंबियांकडे बकऱ्या, जनावरे, कोंबड्या, कुत्रे आहेत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्यांचीही जबाबदारी आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी अधिक जागा असणे गरजेचे आहे.