घर बांधकामाला कोरोना संकटामुळे पुन्हा लागले ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:52+5:302021-03-22T04:25:52+5:30
चंद्रपूर : मागील मार्च महिन्यामध्ये लागलेल्या लाॅकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र पूर्णत: प्रभावित झाले होते. त्यानंतर शिथिलता मिळताच, काही प्रमाणात बांधकाम ...

घर बांधकामाला कोरोना संकटामुळे पुन्हा लागले ब्रेक
चंद्रपूर : मागील मार्च महिन्यामध्ये लागलेल्या लाॅकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र पूर्णत: प्रभावित झाले होते. त्यानंतर शिथिलता मिळताच, काही प्रमाणात बांधकाम करणे सुरू झाले होते. अनेकांनी घरांचे बांधकाम सुरू केले. मागणी वाढल्यामुळे साहित्यांचे दर वाढले. मात्र, आता पुन्हा कोरोना संकटाचे सावट असल्यामुळे घर बांधकाम करणाऱ्या इच्छुक नागरिकांनी आपला प्लॅन बदलवत, या वर्षी बांधकाला ब्रेक दिला आहे, तर काही नागरिकांनी अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे.
‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ या म्हणीप्रमाणे दिवसेंदिवस घर बांधणे सामान्य नागरिकांना अवघड होत आहे. कोरोना लाॅकडाऊननंतर तर बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्न ठरत आहे.
सामान्यत: दिवाळीनंतर घर बांधकाम करण्याचा नागरिकांचा कल असतो. मात्र, मार्च, २०२० मध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र ठप्प झाले. आता अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण केल्या जात आहे. त्यातच लाॅकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्या बंद असल्यामुळे आणि मागणीच्या तुलनेत साहित्याची आवक घटल्यामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले आहे. त्यातच अद्यापही वाळू घाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे लपून-छपून काही जण वाळू पुरवित आहेत. मात्र, भाव अव्वाच्या सव्वा दर द्यावा लागत आहे.
आता डिझेल, तसेच पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे त्याचा फटकाही बांधकामावर होत आहे. व्यावसायिकांनी प्रत्येक वस्तुंवर दर वाढविले आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये घर बांधणे सामान्यांना आता अवाक्याबाहेर आहे. घरकुलाच्या निधीत तर अर्धे बांधकामही पूर्ण होत नसल्याची ओरड आहे.