धान पिकावरील विविध रोगाने शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: October 22, 2015 00:48 IST2015-10-22T00:48:12+5:302015-10-22T00:48:12+5:30
यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची ...

धान पिकावरील विविध रोगाने शेतकरी हवालदिल
निसर्गाचा लहरीपणा भोवला : महागड्या औषधांचा खर्च व्यर्थ
पोंभुर्णा : यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धान पिकावर अचानक विविध रोगाचे आक्रमण झाल्याने परिसरातील शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांना झोडपून काढले असून डोळ्यासमोर धानपिक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.
पोंभुर्णा तालुक्यामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय असून मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही पारंपरिक व्यवसायावर निर्भर आहेत. यंदा मात्र पावसाने चांगलीच खेळी केली. तरी पण कसेबसे शेतकऱ्यांनी घाम गाळून रोवणी करून धानाचे पीक हातात येणार असल्याचे स्वप्न बघत होते. परंतु अचानक धानपिकावर कडपा, कडाकरपा, पांढरा रोग, मावा, तुडतुडा व इतर विविध रोगांनी आक्रमण केले असल्याने आता धानपीक निघूनही शेतकऱ्यांना हाती काहीच लागणार नसल्याची स्थिती परिसरामध्ये निर्माण झाली आहे.
रोवणी केलेल्या पिकाला रोगराईपासून बचाव करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशक औषधीचा वापर करीत आहे. त्यासाठी खाजगी दुकानातून औषधी विकत घेताना महागड्या औषधांचा आर्थिक भुर्दंडसुद्धा सोसावा लागत आहे. एवढे करून धानपिकावरील रोग पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.
विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सिंचनाची सोय नसल्याने वायसर नावाच्या मध्यम प्रतिच्या धानाची लागवड केली असून या धानपिकास शेवटच्या एका पाण्याची गरज असतानाच निसर्गाने दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा शेततलावाची सोय आहे त्यांचे धानपीक काही प्रमाणात तग धरुन आहेत. तर ज्यांचेकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांचे धानपीक सुकून त्याचे तणसात रूपांतर होत आहे. दरवर्षी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षापासून करीत आहे.
जगाचे पोट भरत असताना मात्र त्यालाच स्वत:चे दोन वेळचे जेवण कठीण होत आहे, अशा परिस्थितीमध्ये शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. मात्र वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय असल्याने आणि दुसरे कुठले साधन नसल्याने त्यांना या व्यवसायावर अवलंबून राहावे लागत आहे आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे.
त्यामुळे तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून आर्थिक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)