अतिपावसाचा कडधान्य पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:42+5:30

जिल्ह्यात सावली, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकांची शेती केली जाते. यावर्षी धानपिकाचे क्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून रोवणी तसेच कडधान्य पिकांची पेरणी केली.

Heavy rains hit crops | अतिपावसाचा कडधान्य पिकांना फटका

अतिपावसाचा कडधान्य पिकांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी आर्थिक संकटाततुर, तीळ, पोपटसह इतर पिकांचे नुकसानशेतात पाणी असल्याने पीक कुजलेधान, सोयाबीन, कापूसही धोक्यातकर्ज काढून केली पिकांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर एक-दोन दिवसाआड संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. आताही पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून तुरीची झाडे कुजत आहेत. त्यामुळे तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका तूर, तीळ, पोपट, वाल, कापूस, सोयाबीन या पिकांनाही बसत आहे.
जिल्ह्यात सावली, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकांची शेती केली जाते. यावर्षी धानपिकाचे क्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून रोवणी तसेच कडधान्य पिकांची पेरणी केली. जिल्ह्यातील कोरपना, वरोरा, राजुरा, भद्रावती या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकात तुरीचे आंतरपीक घेतले आहे. अलीकडे आंतरपिकासह अनेक शेतकरी संपूर्ण शेतात तुरीचे पीक घ्यायला लागले आहे, तर काही शेतकरी संपूर्ण शेतात सोयाबीनची पेरणी करतात. यावर्षी जिल्ह्यात तूर व सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र संततधार पावसामुळे हे पीक आता धोक्यात आले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातील पावसाने उसंत घेतल्याने शेतकºयांची काळजी वाढली होती. त्यानंतर संततधार पावसामुळे कडधान्य पिकाची नासाडी होत आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काठालगतच्या शेतजमिनीतील सोयाबीन, तुरी व इतर कडधान्याचे पीक नष्ट होत आहेत. २५ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सतत पाऊस येत असल्याने शेताच्या सखल भागातील तुरी पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. तर काही शेतातील पीक मुसळधार पावसामुळे वाकले असून त्यांचीही स्थिती बिकट आहे.
दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात तुरीचे पीक शेवग्यावर येते. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी चिंतेत आहे.
ज्या शेतकºयांनी तुरीचा पीक विमा काढला, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे. सोयाबीन, कापूस पिकाचीही स्थिती अतिपावसामुळे चिंताजनकच असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

बजेट कोलमडणार
धानपिकासोबत विविध प्रकारच्या कडधान्याचे उत्पादन घेवून शेतकरी प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोन्ही प्रकारचे पिके घेतले तर त्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे धान या मुख्य पिकासह तूर, तीळ, पोपट, वाल हे कडधान्य तसेच सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांचे आर्थिक बजेट यावर्षी कोलमडणार असून आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

सोयाबीनवर किडीचे आक्रमण
यावर्षी सोयाबीन पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. सुरुवातीला बियाणे उगवले नाही. आता सोयाबीनला विविध किडींनी ग्रासले आहे. त्यामुळे पीक पिवळे पडले असून शेकडो हेक्टरवरील सोयाबीनवर खोड किडींचा प्रादूर्भाव झाला आहे.यंदा पर्जन्यमानात बदल झाल्याने सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटले. त्यातच सोयाबीनवर काही प्रमाणात खोड कीड व उंट अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने आता शेतकरी चिंतेत आहे.

दरवर्षी शेतकºयांना या ना त्या कारणामुळे नुकसानीला सामोरे जावे लागते. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पाचविला पुजलेलाच आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यावर्षी संततधार पावसामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन, कापूस पिकांमध्ये गवताची वाढ झाली आहे. शेतातील सखल भागातील तूर तसेच इतर पीक पूर्णत: सडले आहे.
- प्रभाकर जुनघरी, शेतकरी, गोवरी

कवडजई शिवारातील धान पीक पडले पांढरे
येनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील कवडजई शिवारात ९० टक्के धान रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाने अनुकूल प्रतिसाद दिल्याने धान पीक डौलात होते. मात्र अतिपावसामुळे अनेकांच्या धान पिकावर पांढºया रोगाचे आक्रमण झाले आहे. हा रोग सर्वसाधारणपणे लवकर आटोक्यात येतो. परंतु बांदीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. हा रोग वाढू नये यासाठी शेतकºयांनी कृषी सल्ला घेवून योग्य वेळी उपाययोजना करावी. अन्यथा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Heavy rains hit crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.