अहीरकर-वारजुकरांच्या राजकारणावर गुरनुलेंचे बाण

By Admin | Updated: August 27, 2015 01:12 IST2015-08-27T01:12:05+5:302015-08-27T01:12:05+5:30

विनोद अहीरकर आणि सतीश वारजुकर हे केवळ विरोधक म्हणून जिल्हा परिषदेत वागत आहेत.

Gurnnuleen arrow on Ahirkar-Warjukar's politics | अहीरकर-वारजुकरांच्या राजकारणावर गुरनुलेंचे बाण

अहीरकर-वारजुकरांच्या राजकारणावर गुरनुलेंचे बाण

चंद्रपूर : विनोद अहीरकर आणि सतीश वारजुकर हे केवळ विरोधक म्हणून जिल्हा परिषदेत वागत आहेत. मात्र आपल्या कार्यप्र्रणालीमुळे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थामध्ये बाधा येत आहे. यामुळे त्यांनी आपल्यावर आरोपसत्र चालविले आहे, असा खळबळजनक आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला.
मागील अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील योजना आणि विकासकामांच्या अंमलबजावणीत जिल्हा परिषद अध्यक्षांकडून होत असलेल्या गैरप्रकाराबाबत आणि अडवणुकीसंदर्भात आरोप होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर आणि माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांच्याकडून मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या आरोपांना आज संध्या गुरनुले यांनी प्रथमच उत्तर दिले. यावेळी शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य चौखे आदी उपस्थित होते. आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना संध्या गुरनुले म्हणाल्या, मारोडा येथील बंधाऱ्याच्या बांधकामात आपले नाव जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्यक्षात या कामाचे वर्क आॅर्डर ग्रापमंचायतीला दिले असून एजंसीही ग्रामपंचायतच आहे. आपल्या नातेवाईकांना यात काम दिल्याचा आरोप निराधार आहे. आपण अध्यक्ष असल्याने कामाच्या नस्ती पाहणे आणि बाळगणे हा अधिकार आहे. योग्य कालावधीनंतर आपण नस्त्या परतही केल्या आहेत. मात्र त्या संदर्भातही आरोप आपल्यावर आरोप झालेत. जलयुक्त शिवार योजनतील कामाला जिल्ह्यात गती असल्याचा दावा त्यांनी केला.
१३ व्या वित्त आयोग निधीच्या खर्चासाठी ३१ सप्टेंबर २०१५ ही मुदत ग्रामीण विकास मंत्रालयाने दिली आहे. यातून मिळालेला एक कोटी ४२ लाख रूपयांचा निधी अखर्चित राहील्याचा आरोपही खोटा असल्याचे त्या म्हणाल्या. या निधीतील कामाचे ३१ मार्चपूर्वीच नियोजन झाले असून यातून ग्रापंचायतींना सौर दिवे, फॉगींग मशिन, ५४ ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी साडेतीन लाख रूपयांचा निधी, असे नियोजन करण्यात आले असून ३१ सप्टेंबरपर्यंत निधी खर्च होणार आहे.
स्थायी समितीची विशेष सभा घेण्यात चालढकल केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. अशी सभा घेण्याची कुठेच तरतुद नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे ५४ कोटी रूपये परत जाणार असल्याचा आरोप जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील ४२ कोटी २८ लाख रूपये अखर्चित राहील्याचे मान्य करून त्या म्हणाल्या, या निधीचे नियोजन केले असून कामाच्या कार्यारंभाचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना मुदतवाढ देण्याची बाब आपल्या अधिकारात येत नाही. तरीही ३५ योजनांना मुदतवाढ दिल्याचा आरोप आपल्यावर लावला जात आहे. ही बाब प्रशासकीय स्तरावरील असून प्रशासनाने मान्यता दिली आहे. तत्कालिन अध्यक्षांच्या काळातही या कामासाठी मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी आता आम्हीही आरोप करायचे काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)
नियमानुसार काम तर करा-
विनोद अहीरकर

जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी नियमाप्रमाणे काम करावे. त्या नियमानुसार काम करणार असतील, तर आम्ही अडथळे आणण्याचा प्रश्नच येणार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य विनोद अहीरकर यांनी संध्या गुरनुले यांना प्रत्यत्तर दिले. ‘लोकमत’ने या आरोपांसंदर्भात त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आमचे स्वार्थ कोणते आणि कोणत्या फाईलमध्ये आहेत, ते एकदा त्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी केलेले सर्व खुलासे मोघम असून वस्तुस्थितीपासून दूर नेणारे आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगावे, आम्ही पुराव्यानिशी चर्चेला तयार आहोेत. लवकरच त्यांच्या गैरकारभाराचा पर्दाफाश आम्ही करणार असून त्यांना नेमका कुठे इंन्टे्रस्ट आहे, ते सांगू. १३ व्या वित्त आयोगाच्या कामात स्पष्टता होती तर त्यांनी दोन पत्र का काढले, हे आधी स्पष्ट करावे. ग्रामपंचायतींना ५७ पॉवर पॅक देण्याचे ठरले असतानाही तब्बल तीन महिने यादी का पाठविली गेली नाही, हे सुद्धा त्यांनी सांगावे, असाही प्रश्न उपस्थित केला.

Web Title: Gurnnuleen arrow on Ahirkar-Warjukar's politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.