भाजपामुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला
By Admin | Updated: October 28, 2015 01:09 IST2015-10-28T01:09:18+5:302015-10-28T01:09:18+5:30
महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणुकीत भाजपाने दिले होते.

भाजपामुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला
अशोक चव्हाण यांचा आरोप : चिमुरात प्रचार सभा
खडसंगी : महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणुकीत भाजपाने दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री आठ वेळा विदेशवारी करुन आलेत. मात्र युवकांना रोजगार देणे तर दुरच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी चिमूर येथील प्रचार सभेत केला.
चिमूर येथील शेतकरी भवनात मंगळवारी नगर परिषद निवडणूक प्रचारानिमित्त आयोजित सभेला प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अनिलराव धारट, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, माजी अध्यक्ष तथा गटनेता डॉ. सतीश वारजूरकर, पंजाबराव गावंडे, संजय डोंगरे, राजू पाटील झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार अशोक चव्हाण पुढे म्हणाले, गरीबाला महागाईमुळे तुर डाळ चाखणे दुर्मिळ झाले आहे. गरीबाला अन्न मिळत नाही. सध्याचे सत्ताधारी देशाला जाती- जातीत विभागण्याचे काम करीत आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले याच्या विचारामुळे देश आजही एकसंघ व सुरक्षित आहे. सर्वसामान्य मतदारांनी १५ लाख मिळणार म्हणून भाजपाला मतदार केले. मात्र १५ पैसेही मिळाले नाही. त्यामुळे भाजपाने सर्व सामान्यांना फसविले आहे.
तेव्हा त्यांना जॉब विचारण्याकरीता नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करुन नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन खासदार चव्हाण यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळग्रस्त नाही. त्यामुळे सर्वच खावून सुखी आहेत काय, सर्वानाच चांगले पीक आले काय, असा प्रश्न उपस्थित करीत विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर तोप डागली. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. धानाला भाव तीन हजार वरुन १७०० रुपये झाले. त्यामुळे येत्या एक तारखेच्या निर्णयावर शेतकऱ्याचं भविष्य ठरणार असल्याचे आमदार वडेट्टीवार म्हणाले.
याप्रसंगी पक्षाचे सर्वच १७ उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश वारजूरकर यांनी केले. संचालन सुधीर पोहणकर तर आभार राजू देवतळे यांनी मानले. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)