वाढोण्याच्या केरसुणीचा जिल्ह्यात लौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:27 AM2021-04-11T04:27:44+5:302021-04-11T04:27:44+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : काही काही गावांचे एक निश्चित वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळे त्या गावाचे नाव पंचक्रोशीत होत ...
घनश्याम नवघडे
नागभीड : काही काही गावांचे एक निश्चित वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळे त्या गावाचे नाव पंचक्रोशीत होत असते. नागभीड तालुक्यातील वाढोणा या गावाचेही असेच आहे. तेथील केरसुणी या गृह उद्योगामुळे वाढोण्याच्या लौकिकात आणखीच भर पडली आहे.
नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले वाढोणा हे तसे स्वयंभू आणि तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव. सभोवतालच्या आठ दहा गावांची बाजारपेठ. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव.अशी स्वतंत्र ओळख असलेल्या गावात केरसुणी या गृहउद्योगाने चांगलीच गती पकडली असून या गावातील किमान १०० व्यक्ती या उद्योगावर आपले अर्थार्जन करतात अशी माहिती आहे.
वाढोणा गावालगत जंगल बऱ्याच प्रमाणात असून या जंगलात सिंदीची झाडे आहेत. दिवाळी झाली झाली की, वाढोणा येथील काही व्यक्ती केरसुणी निर्मितीच्या कामास सुरूवात करतात. यासाठी जंगलातून सिंद आणून ती केरसुणीयोग्य करणे. नंतर त्याची केरसुणी तयार करणे व तयार झालेल्या केरसुणी विक्री करण्यासाठी गावागावात जाणे हा त्यांचा क्रम आहे. नागभीड व तळोधी परिसरातील गावात ज्या केरसुणी मिळतात, त्या बहुतेक वाढोणा येथे तयार झालेल्याच असतात.
दिवाळीपासून सुरू झालेला हा वाढोण्यातील केरसुणी गृहउद्योग जून, जुलै महिन्यापर्यंत चालतो. एकदा पावसाने सुरूवात केली की मग या उद्योगात असलेले शेतीच्या कामात व्यस्त होतात, अशी माहिती केरसुणी विक्रेत्या शोभा कावळे या महिलेने दिली.
बॉक्स
हिंस्त्र श्वापदांची भीती
केरसुणीसाठी आवश्यक असलेली सिंद ही जंगलातूनच आणावी लागते. वाढोणालगतचा जंगल परिसर घनदाट आहे. या जंगलात जंगली श्वापदांनी मानवावर हल्ला केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे भीतीयुक्त वातावरणातच या व्यावसायिकांना जंगलातून सिंद आणावी लागते.
बॉक्स
रेल्वे बंदचा फटका
वाढोण्यातील या केरसुणी गृह व्यवसायास मागील वर्षीपासून बंद असलेल्या रेल्वे बंदचा मोठा फटका बसला आहे. गोंदिया- चंद्रपूर ही रेल्वे सुरू होती, तेव्हा वाढोण्यातील हे केरसुणी विक्रेते रेल्वेने वाहतूक करून चंद्रपूर , बल्लारपूर व चंद्रपूरच्या आसपासच्या वसाहतीमध्ये केरसुणी विकायचे. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेने केरसुणी व्यवसायास चांगलाच फटका बसला आहे. आता त्यांना तयार करण्यात आलेल्या केरसुणी नागभीड व सिंदेवाही तालुक्यातच विकाव्या लागत आहेत.