विंधन विहिरीतून होणार हरितक्रांती !
By Admin | Updated: March 6, 2016 00:36 IST2016-03-06T00:36:46+5:302016-03-06T00:36:46+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय अनेक ऋतुचक्रामुळे संकटात आला आहे.

विंधन विहिरीतून होणार हरितक्रांती !
दिलासादायक उपक्रम : २०१६ मध्ये २४६ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी
राजकुमार चुनारकर - खडसंगी
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय अनेक ऋतुचक्रामुळे संकटात आला आहे. कधी निसर्ग कधी बाजारभाव तर कधी रोगाच्या आक्रमनाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नापिकी व बाजारभावामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्च भागवता येत नाही तर कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. चिमूर तालुक्यातील विंधन विहीरीचे पाणीच शेतकऱ्यांना संजीवनी देणारे ठरणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचणार असून ते पाणी शेतकऱ्यांना नवे बळ देणार आहे.
चिमूर तालुक्यातील शेतीसाठी कोणताच मोठा प्रकल्प किंवा धरण नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पाण्यावाचून चांगले उत्पादन होऊ शकत नाही तर सर्व शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी येणार, या आशेवर होता. परंतु अजूनही गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले नाही. हा गोसेखुर्दही चिमूर तालुक्यासाठी दिवास्वप्नच ठरत असल्याच्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत.
शेतकऱ्यांना काही प्रमाणात बळ मिळावे म्हणून शासनाच्या योजनेनुसार विंधन विहिरी शेतकऱ्यांना तारणहार ठरणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अल्पभूधारक अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना विंधन विहिरी देऊन त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने चालवलेला हा प्रयत्न आहे. चिमूर तालुक्यातील एकूण शेतीपैकी ५२ हजार ७०० हेक्टर शेती कोरडवाहू आहे. या कोरडवाहू शेतीला पाण्याचे साधन नसल्याने हे शेतकरी नेहमी चिंतेत असतात. या शेतकऱ्यांना काही प्रमाणात बळ मिळावे म्हणून विंधन विहिरीची योजना शासन राबवित आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील १२९९ विहीरीपैकी ८३७ विहिरी पूर्ण झाल्या असून १४४ विहिरी अपूर्ण आहेत. जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये चिमूर तालुक्याला ४२० विंधन विहिरीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २४६ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. तर १५८ विहिरीचे बांधकाम सुरू आहे. १६ विहिरी काही कारणामुळे अपूर्ण आहेत. मात्र चिमूर तालुक्यात या सत्रात २४६ विंधन विहिरी पूर्ण करून जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्या खालोखाल ब्रह्मपुरी तालुक्याचा क्रमांक लागतो तर सर्वात मागे जिवती तालुक्याचा क्रमांक आहे. या तालुक्यात फक्त आठ विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत.
मात्र जिल्ह्यात चिमूर तालुका २४६ विंधन विहिरी पूर्ण करीत जिल्ह्यात अव्वल आला आहे. चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोई नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र तालुक्यातील २४६ विंधन विहिरी आल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. शेतकरी यामुळे समाधान व्यक्त करीत आहेत.