सोमवारपासून मिळणार संजय गांधी योजनेतून अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:01:21+5:30

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी जिल्हावासियांशी व्हिडीओ संवादाद्वारे संपर्क साधला. एक पॉझिटिव्ह रुग्ण शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आणू शकतो. त्यामुळे अन्य शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती न घाबरता प्रशासनाला द्या. तपासणी करून घ्या. घरातच रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Grants from Sanjay Gandhi Yojana will be available from Monday | सोमवारपासून मिळणार संजय गांधी योजनेतून अनुदान

सोमवारपासून मिळणार संजय गांधी योजनेतून अनुदान

ठळक मुद्देसर्व तालुक्यांना रक्कम वितरित : ११३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रासह देशामध्ये मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे गाफील न राहता पुढील आदेशापर्यंत गरज नसेल तर बाहेर पडू नका. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान सर्व तालुक्यांना शुक्रवारी जमा झाले आहे. जिल्ह्यातील नऊ हजार लाभार्थ्यांना सोमवारपासून याचा लाभ मिळणार आहे. मात्र बँकेत यासाठी एकाच वेळी झुंबड करू नये. गावातील आपले सरकार सेतू केंद्र व बँकेमध्ये अंतर राखून व्यवहार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी जिल्हावासियांशी व्हिडीओ संवादाद्वारे संपर्क साधला. एक पॉझिटिव्ह रुग्ण शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आणू शकतो. त्यामुळे अन्य शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती न घाबरता प्रशासनाला द्या. तपासणी करून घ्या. घरातच रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ९० नागरिकांची नोंद करण्यात आली असून यातील ८२ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यापैकी ७८ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर चार नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या ३१ हजार ४११ आहे. यापैकी दोन हजार ५४४ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २८ हजार ८६७ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ११३ आहे.

कृषी केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार
सोबतच खरीप हंगामासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रशासनाने केल्या असून यावर्षी मान्सून नियमित असल्याने शेतकऱ्यांनी शारीरिक अंतर ठेवून खरीप पूर्व हंगामाची तयारी करावी. शेतकऱ्यांना शेतात करायच्या नियमित कामांमध्ये कोणताही अडथळा नाही. खते, बियाणे याची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांना सकाळी १० ते ५ सुरू राहण्याची परवानगी दिली आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज घेण्यासाठी बँकेतच स्टॅम्प उपलब्ध करण्यात आले आहे. ट्रॅक्टर व शेती अवजारे दुरुस्त करणाऱ्या सर्व दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवत शेतीची सर्व कामे सुरू करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तथापि, हे करीत असताना मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, परस्परांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. धार्मिक, पारंपारिक, लग्न, तेरवी, वाढदिवस, सण-उत्सव यात गर्दी होणारच नाही, असे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
७३९ वाहने जप्त
संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करणाºयांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील २२९ प्रकरणात एकूण १२ लाख ७४ हजार ७७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाºया ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७३९ वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने जारी केलेले नियम व सूचनांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

केशरीकार्डधारकांनी धान्याची उचल करावी
मोबाईल रिचार्जची दुकाने सुरू करण्यात आली असून सकाळी ७ ते दुपारी २ या काळात ती सुरू राहतील. जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकावर देखील अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या २१ लाखांच्या लोकसंख्येमध्ये १५ लाख लोकांपर्यंत अन्नधान्य सार्वजनिक वितरण प्रणालीतून पोहोचत आहे. मात्र, केशरी शिधापत्रिकाधारकांना मानसी आठ रुपये किलो दराने तीन किलो गहू व प्रति व्यक्ती १२ रुपये किलो दराने दोन किलो तांदूळ वितरित केले जाणार आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनी आपले अन्नधान्य रेशन दुकानातून उचलावे. केशरी शिधापत्रिकाधारकांना हे अन्नधान्य मोफत नाही.
मास्क अनिवार्यच
चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या नातेवाईक व कौटुंबिक सदस्यांना ३ मेपर्यंत जिल्ह्यात येऊ नये, असा संदेश द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Grants from Sanjay Gandhi Yojana will be available from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.