ग्रामपंचायत सदस्यांनाही आता येणार ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: July 26, 2015 01:34 IST2015-07-26T01:34:48+5:302015-07-26T01:34:48+5:30
ग्रामपंचायतींना मिळणार थेट निधी : मासिक सभांना आर्थिक खर्चाने अधिकार

ग्रामपंचायत सदस्यांनाही आता येणार ‘अच्छे दिन’
खडसंगी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांच्या मागे लागून ग्रामपंचायतीचे कामे मागण्याचा काळ आता मागे पडणार आहे. थेट ग्रामपंचायतींनाच लोकसंख्येच्या तुलनेत कोट्यवधीचा निधी मिळणार असल्याने यापुढे ग्रामपंचायत सदस्यांनाही ‘अच्छे दिन’ येणार आहेत. त्याचेच चित्र आताच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या उमेदवारांच्या संख्येवरुन पहायला मिळत आहे.
यापूर्वी वित्त आयोगाच्या निधीसाठी पंचायत राज संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेनुसार कारभार सुरू होता. त्यामुळे आमदार- खासदाराप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या मदतीनेच ग्रामपंचायतीच्या सरपंचांना गावासाठीचा विकास निधी मिळत होता. मात्र आता चौदाव्या वित्त आयोगासह इतरही केंद्र व राज्य सरकारच्या योजनातून थेट ग्रामपंचायतीवरच कोट्यवधी रुपयांच्या निधीचा पाऊस पाडण्याची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी होणार आहेत. त्यानुसार आता सरपंचांना फक्त आमदार- खासदारांच्या पुढे- पुढे करुन निधी मिळू शकतो.
कारण जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून एक कवडीही मिळणार नसल्याने आतापर्यंत येथील सदस्यांना असणारा भाव पूर्ण कमी होणार आहे. आतापर्यंत एक हाथी कारभार हाकणाऱ्या सरपंचांना, ग्रामपंचायत सदस्यांनाही हाताशी धरुनच विकास कमााचा निधी खर्च करावा लागणार आहे.
याच मार्गदर्शक तत्वामुळे सध्या जिल्ह्यात बोलबाला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेतही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे चित्र उमेदवारांच्या संख्येवरुन दिसून येत आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात सरपंचासह आता सदस्य होण्यासाठी साम-दाम- दंड- भेद या मार्गाचा अवलंब करण्यासाठी तरुणाई सरसावल्याचे चित्र मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये दिसत आहे.
अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढल्याने गावपुढाऱ्यांची मोठी पंचाईत झालेली आहे. आतापर्यंत मतदारांना चिरीमिरी देऊन सरपंच पद पदरात पाडून लाखो रुपयांची कमाई करण्यात व सदस्यासह ग्रामस्थांनाही हुलकावणी देण्याचेच धोरण सुरू होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना महत्त्व येणार आहे. (वार्ताहर)