ग्रामीण भागात ‘लगानरुपी’ धान्याची वसुली
By Admin | Updated: September 29, 2014 23:02 IST2014-09-29T23:02:43+5:302014-09-29T23:02:43+5:30
शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे.

ग्रामीण भागात ‘लगानरुपी’ धान्याची वसुली
शेतकऱ्यांची लूट : शेतीपयोगी साहित्याच्या लाकडाला मोबदला
गोंडपिंपरी : शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा होते. मात्र शासन प्रणालीतील काही स्वार्थी अधिकारी व राजकारण्यांमुळे कल्याणकारी योजनांपासून शेतकरी वंचित आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून ‘लगान’ च्या रुपात धान्य वसूल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. वर्षभर शेती उपयोगी साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकुडाच्या मोबदल्यात खंडीच्या मापाने धान्य वनकर्मचाऱ्यांना द्यावे लागत असल्याची माहिती मिळाली.
जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिंपरी हा नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल व अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जातो. सदर तालुक्यातील बहुतांश जमिन वनाने व्यापली आहे. तालुक्यातील ८० टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेती या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रासह प्राचिन काळापासून लाकडी साहित्य तयार केलेल्या साधनांचा वापर केला जातो.
मात्र वनविभाग आगारात ग्रामीण शेतकऱ्यांना शहरी व्यापाऱ्यांपुढे किंमत बोली लावणे अवघड जात असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अशातच काही शेतकऱ्यांनी वनविभागाच्या ग्राम अंतर्गत कर्तव्य बजावणाऱ्या वनरक्षकांकडे लाकडाची मागणी केली असता त्याचा मोबदला म्हणून वनकर्मचारी ‘लगान’ च्या रुपात धान्याची मागणी केल्या जात असल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी आजही ‘लगान’ चुकवित असल्याचे शेतकऱ्यांकडून मियालेल्या माहितीवरुन समजते. या संदर्भात पीडित शेतकऱ्यांना आपण वरिष्ठस्तरर गाठून तक्रार का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला असता शेती साहित्याचे लाकूड अगारातून मिळविणे फार अवघड असून पिढ्यांनपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसारच खंडीच्या मापाने धान्य मोजून देत असल्याचे सांगितले. तसेच निस्तार काड्या व पाने तोडण्यासाठी सतत वनात जावे लागत असल्याने वनकायद्यात अडकविण्याची भिती देखील निर्माण होत असल्याची व्यथा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
एकंदरीत या सर्व प्रकारावरुन ब्रिटीश हुकूमशाहीच्या आठवणी ताज्या होत असून ग्रामीण भागातील गंभीरर प्रकार शेतकऱ्यांच्या चांगलाच अंलगट येत आहे. (तालुका प्रतिनिधी)