सर्वेक्षण करणारी सरकारी यंत्रणा शेतात पोहोचलीच नाही
By Admin | Updated: September 30, 2015 01:40 IST2015-09-30T01:40:25+5:302015-09-30T01:40:25+5:30
१६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके

सर्वेक्षण करणारी सरकारी यंत्रणा शेतात पोहोचलीच नाही
जिवती: १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके आडवी झाली. यामुळे हाती येणाऱ्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत असले तरी आठवडाभरानंतरही पिकाचे सर्वेक्षण करणारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नसल्याने पहाडावरील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.
तालुक्यात एक लाख ४६ हजार ६३८ हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात कापूस १० हजार ९१० हेक्टर, तुर एक हजार १२० हेक्टर, ज्वारी एक हजार ७७५ हेक्टर, तर ५६२ हेक्टरवर सोयाबिनची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाने पहाडावरील शिवार फुलले होते. समाधानकारक पिके पाहून शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र १६, आणि १७ सप्टेंबरला झ्ोालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात हिरवीगार दिसणारी पिके काही क्षणातच आडवी झाली. काही झाडे तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले. वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या प्रकोपामुळे तोंडचा घास हिरावला गेल्याचे चित्र असतानाही संबंधित विभागाने शेतीचे सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही दाखविले नाही. अतिवृष्टीनंतर तर तहसीलदारांनी पिकाचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पटवारी यांना केल्या होत्या. मात्र सर्वेक्षण झाले नाही.(तालुका प्रतिनिधी)
दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील हिरवीगार पिके क्षणात आडवी पडली. हाती येणाऱ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्याचे सर्वेक्षण तर झालेच नाही; पण आता परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने आहे ते पिकही करपत आहे. त्यातच कापसावर लाल्या रोगाचा प्रभावही दिसत आहे. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांवर अशी संकट येत असताना उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.