सरकारने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचेही मोडले कंबरडे
By Admin | Updated: June 26, 2015 01:18 IST2015-06-26T01:17:36+5:302015-06-26T01:18:15+5:30
केंद्रात व राज्यात सत्ता मिळविण्यासाठी गरीब-श्रीमंत, व्यापारी आणि विशेषत: विदर्भातील धान उत्पादक ....

सरकारने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचेही मोडले कंबरडे
उपरी : केंद्रात व राज्यात सत्ता मिळविण्यासाठी गरीब-श्रीमंत, व्यापारी आणि विशेषत: विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चा नारा लावून सत्ता काबीज केली. मात्र सत्तेत येताच केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडून टाकले. परिणामी तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण विदर्भातील जे व्यापारी स्वत: धान खरेदी करून भातगिरणीवर तांदूळ काढून परप्रांतात व्यवसाय चालवतात, ते व्यापारी धान खरेदी विक्रीच्या मंदीमुळे शांत बसल्याने त्यांच्या भात गिरण्याही ओस पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील पाच वर्षात काँग्रेस, राकाँ सरकारच्या काळात शेतकऱ्यासाठी सुगीचे दिवस होते. शेतकऱ्यांचे खरीप पिकातील धानास नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच दोन हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव मिळाला होता. दोन चार महिन्यानंतर २५०० ते २९०० रु. प्रति क्विंटल असा धानाचा भाव मिळत होता. मात्र सरकार बदलताच शेतकऱ्यांच्या धानाला कवडीमोल किंमत लागली. सुरुवातीस १९०० रु. क्विंटल उच्च वर्णीचा धानाला भाव होता. लगेच महिनाभरातच १८०० रुपयावर आला. त्यामुळे मागील वर्षात धानाचे भाव कमी झाल्याने व्यापारी वर्गाने शेतकऱ्यांचा धानाला १८०० रुपयेपर्यंत भाव देऊन धान खरेदी करीत असल्याने शेतकरी बांधवांनी धानाची साठवणूक करून ठेवली आहे. धानाला योग्य भाव मिळाल्याशिवाय धानाची विक्री करायची नाही, असे ठरवून घेतले. त्यामुळे भातगिरणी चालविणाऱ्या व्यापाऱ्यांनासुद्धा धान मिळत नसल्याने त्या भात गिरण्याही ओस पडल्या आहेत. अशीच परिस्थिती राबविल्यास धान खरेदी करून तांदुळ निर्माण करून निर्यात करणाऱ्या भात गिरण्या बंद पडण्याची भीती भात गिरणीच्या मालकांना पडली आहे.
आज जून महिना आला असतानाही शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांकडून शासनाप्रति रोष व्यक्त केला जात आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या धानाला कवडीमोल किंमत तर दुसरीकडे शासनाच्या खासगी बियाणांच्या किंमतीत मात्र भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. संकरीत केलेली १० रु. धानाच्या बॅगची किंमत ५५० रु. ते ६५० रुपये एवढी आहे. म्हणजे या धानाची प्रति किलो किंमत ५५ ते ६० रुपये एवढी आहे. मात्र शेतकरी वर्ग धान पिक हाती आणण्यासाठी वर्षभर शेतीची मशागत करून एकरी १० ते १५ हजार रुपये खर्चुन पिक घेतो, त्या शेतकऱ्यांच्या धानास प्रति किलो २० रु. एवढीही किंमत मिळु नये, ही शोकांतिका असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी यावर्षी खताचे भाव स्थिर राहतील, असे सांगितले. मात्र सोसायटी, कृषी केंद्रात आलेल्या खतांची बॅग १५० रुपयांनी वाढीव किंमतीने शेतकऱ्यांना मिळत असल्याने कोणत्या खताचे भाव स्थिर आहेत या संभ्रमात शेतकरी बांधव पडलेला आहे. एकंदरीत सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ चा नारा लावला. ते अच्छे दिन केव्हा मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी बांधव, व्यापारी सध्या दिसून येत आहे. (वार्ताहर)
केंद्रात व राज्यात सत्तांतर झालेल्या सरकारने धान, तांदूळ या शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकावर निर्यात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे परप्रांतातून खरेदी-विक्री करणारे व्यापारी बंद पडले आणि सरकारने धानाचे भाव ठरविलेले नसल्याने व्यापारी-मनमर्जीने धान खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नाही. सरकारने निर्यातबंदी हटविण्यास शेतकऱ्यांचे धानास योग्य भाव मिळेल, असा विश्वास आहे. एकूणच हा निर्यात बंदीचा परिणाम आहे.
- प्रशांत चिटनुरवार, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सावली