शासनाची शंभर एकर जमीन पडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:58 IST2017-08-13T23:57:43+5:302017-08-13T23:58:22+5:30

सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे.

Government can get 100 acres of land | शासनाची शंभर एकर जमीन पडीत

शासनाची शंभर एकर जमीन पडीत

ठळक मुद्देलाखोंचे उत्पन्न बुडाले : कोट्यवधीची संपत्ती धूळखात

उदय गडकरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे. या शेतातील धान उत्पादनातून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासोबतच कोट्यवधीची संसाधने धूळ खात असल्याचेही पहावयास मिळत आहे.
या तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तालुका बीजगुणक प्रक्षेत्र बोथली नावाने शंभर एकर शेती शासनाने हस्तांतरित करुन उत्पादन घेण्यायोग्य बनवली. लाखो रुपये खर्च करुन त्या शेतीची सुधारणा केली. मात्र मागील चार- पाच वर्षापासून या शेतीतून उत्पन्न घेण्यात कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कृषी उपविभाग चंद्रपूर यांच्याकडे सदर शेतीचे व्यवस्थापन असून तेथील देखभाल व उत्पादन घेण्यासाठी मिश्रा नामक एका कृषी सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु या शेतीकडे कुणाचेही लक्ष नाही. एवढेच नव्हे तर या शंभर एकर शेती परिसरात असलेली कृषी विभागाची कोट्यवधीची वनसंपदाही वाºयावर सोडण्यात आली आहे.
या शेतातून एकरी २० क्विंटल धानाचे उत्पादन जरी गृहित धरले आणि प्रति सरासरी दोन हजार रुपये भावाच्या हिशोबाने ४० लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत होते. खर्च वजा जाता किमान २० लक्ष रुपयांच्या शुद्ध नफ्यापासून शासन वंचित झाले आहे. याशिवाय कोट्यवधी रुपये खर्चून उपलब्ध करण्यात आलेली संसाधने धूळ खात पडलेली पहावयास मिळत आहेत.
सावली नगरापासून दहा किमी अंतर असलेल्या तालुका वीज गुणक प्रक्षेत्र बोथली येथे सदर प्रतिनिधीने भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली असता उपलब्ध संसाधनाची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले. या शेतातून उत्पन्न घेण्यासाठी दोन मोठ्या विहिरी, १.५ अश्वशक्तीचे आईल इंजीन, ३.५ अश्वशक्तीची विद्युत मोटार, एक जेट पंप, एक स्प्रिंकलर प्रिमीयम संच, ४६८ मीटरचे पीव्हीसी पाईप, याशिवाय धान्य साठविण्याकरिता तीन गोदाम, एक ट्रॅक्टर, आणि जीर्ण अवस्थेतील कार्यालयांचा समावेश आहे. अशा प्रकारची कोट्यवधी रुपयांची संपत्ती सध्या बेवारस आहे.
या तालुका बीजगुणक प्रक्षेत्र केंद्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित वाणांचे व प्रजातींचे संशोधन करण्यात यावे आणि शेतकºयांच्या उत्पादनात भर पडावी, हा प्रशासनाचा हेतू होता. मात्र कृषी उपविभागीय कार्यालय चंद्रपूरच्या उदासीनतेमुळे या शासनाच्या उदात्त हेतुलाच हरताळ फासण्याचे काम विद्यमान अधिकाºयांकडून, कर्मचाºयांकडून केले जात आहे. या परिसरात आंबा, चिक्कू, करवंद, आवळा, खिरव्या यासारख्या फळझाडांसोबतच साग वृक्षांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. ही वनसंपदासुद्धा लाखो रुपयांच्या घरात आहे. असेच दुर्लक्ष झाले तर ही वनसंपदासुद्धा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या परिसरात असलेल्या शासनाच्या अनेक मौल्यवान मोटारींचीही चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शेती योग्य असणारी जमीन गेल्या चार वर्षापासून पडित असल्यामुळे गुरांचे कुरण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकरी आपल्या गुरांना चरण्यासाठी या शेतात आणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. घनदाट जंगल परिसराच्या मध्यभागी असलेल्या संसाधनांची सुरक्षा करण्याकरिता एका वृध्दाची नेमणूक करण्यात आली, हे विशेष.

Web Title: Government can get 100 acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.