संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच गोसीखुर्द प्रकल्प

By Admin | Updated: August 21, 2015 01:41 IST2015-08-21T01:41:20+5:302015-08-21T01:41:20+5:30

आपण तक्रार केली म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोला मेंढा आणि घोडाझरी तलावात आले नाही, ...

Gosikhurd Project is in the interest of the farmers in distress | संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच गोसीखुर्द प्रकल्प

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच गोसीखुर्द प्रकल्प

चंद्रपूर : आपण तक्रार केली म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोला मेंढा आणि घोडाझरी तलावात आले नाही, असा आरोप आ. शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून आपल्या प्रयत्नामुळे गराडी नाल्यावरील जलसेतूमध्ये अस्थाई स्वरूपाचे काम केल्यानंतर गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आता आसोलामेंढा तलावात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या कामाचे श्रेय वडेट्टीवार यांना मिळू नये, यासाठीच बिनबुडाचे आरोप त्यांनी केले आहे. आपण श्रेय घेण्यासाठी काम केले नाही तर संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी काम केले आहे, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले आहे की, गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याचे काम आसोलामेंढा तलावापर्यंत तीन वर्षापूर्वीच पूर्ण झाले होते. तेव्हा तीन वर्षापूर्वी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावासाठी सोडले होता. परंतु भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बांधण्यात आलेला कालवाच फूटल्यामुळे आसोलामेंढा प्रकल्पात पाणी पोहचू शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्याच्या ४५/६६० असलेल्या गराडी नाल्याचा जलसेतू तीन वर्षापूर्वीच मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाला होता. त्यावेळी या क्षेत्रात भाजपाचे आमदार असतानासुद्धा गेल्या तीन वर्षात क्षतीग्रस्त जलसेतूचे काम करता आले नाही. ब्रह्मपुरी विधानसभेची निवडणूक जिंकताच या महत्वपूर्ण कामाकडे जातीने लक्ष देऊन सतत पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. पत्रव्यवहार केले. त्यामुळेच गराडी जलसेतूच्या क्षतीग्रस्त भागामध्ये युद्धपातळीवर अस्थाई स्वरूपाचे काम सुरु झाले असून त्यात ३०० मीटरच्या पूर्वी आणि नंतर हेडवॉलचे बांधकाम करुन एक मीटर व्यासाचे ३०० मीटर लांब असलेल्या १२०० मीटरचे चार पाईप लाईन बसविण्यात येणार आहे. यासाठी २०० पाईप लागणार असून युद्ध पातळीवर १२०० मीटर पाईप बसविण्याचे काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. या कामाकरिता अंदाजे ६० लाख रुपये खर्च होणार आहे. सदर काम पूर्ण होताच गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे आसोलामेंढा तलावात सोडण्यात येणार असून त्याद्वारे सावली आणि मूल तालुक्यातील संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम आपण करीत असून श्रेय घेण्यासाठी काम करीत नाही. आ. शोभाताई फडणवीस या ज्येष्ठ आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. जनता ही काम करणाऱ्यांना श्रेय देते. श्रेय देण्याघेण्याचा विषयच नाही. पण आता गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात येणार आहे आणि शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न मिटणार आहेत.
हे आता स्पष्ट दिसत असल्यामुळेच बिनबुडाचे आरोप आ. शोभाताई फडणवीस यांनी आपणावर केले आहे, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gosikhurd Project is in the interest of the farmers in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.