घुग्घुस नगर परिषदेसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:24 IST2017-07-18T00:24:13+5:302017-07-18T00:24:13+5:30
येथील ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी सोमवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समोर घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

घुग्घुस नगर परिषदेसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे
एल्गार : न.प. स्थापना संघर्ष समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी सोमवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समोर घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान जिल्हा परिषदच्या कार्यकारिणी व स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
धरणे आंदोलन दरम्यान जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, जि.प.सदस्य सतिश वाजुरकर, माजी जि.प.सदस्य विनोद अहिरकर, गजानन गावंडे, अशोक नागपुरे, नंदा अलुरवार यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन मागणीला समर्थन दिले. शासन तरतुदीनुसार ग्रामसभेच्या ठरावाला विशेष महत्त्व आहे. नगर परिषदेचा दर्जाप्राप्ती संबंधीचे संपूर्ण निकष १५ वर्षांपूर्वी घुग्घुस ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहे. १९९९ च्या जनगणनेनुसार २५ हजार तर २००१ च्या जनगणनेनुसार २९ हजार ९४५ व २०११ नुसार ३२ हजार ७२६ एवढी घुग्घुसची लोकसंख्या आहे. लोकसंख्या वाढीचा दर ३ टक्क़े आहे. त्यानुसार सद्यस्थितीत ४५ हजारांपेक्षा अधिक येथील लोकसंख्या आहे.
कोळसा खाणी, सिमेंट कारखाना, लोखंडाचा कारखाना असल्याने या उद्योगांपासून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. नगर परिषदेचा दर्जा मिळावा यासाठी १५ वर्षांपासून शासनाकडे सातत्याने मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. तत्कालीन ग्राहक संरक्षण मंत्री व वर्तमान वने, अर्थ नियोजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्घुस नगर परिषद अस्तित्वात आल्याची घोषणा एका कार्यक्रमात वर्तमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केली होती. अंमलबजावणी झाली नाही. भाजपचीच सत्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात समितीचे अध्यक्ष शामराव बोबडे, लक्ष्मण सादलावार, राजीरेड्डी प्रोद्दटुरी, जावेद सिद्दीकी, अनवर सैय्यद व पदाधिकारी, रामपाल वर्मा, सुनिल जानवे, श्रीनिवास गोसकुला, संजय भोंगळे, नागेश पथाडे, शिवसेना गणेश शेंडे, राकेश जयस्वाल, संगित बोबडे, शालू बांदुरकर, गीता बोबडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक सहभागी होते.