जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या
By Admin | Updated: May 5, 2016 01:29 IST2016-05-05T01:29:01+5:302016-05-05T01:29:01+5:30
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेने करून

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या
धर्मेश फुसाटे यांचे निर्देश : तहसीलदार व बँक व्यवस्थापकांची संयुक्त बैठक
राजुरा : ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण परतफेड झाले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकेने करून देण्यासंबंधी राजुरा तालुक्यातील सर्व बँकांच्या व्यवस्थापकाची बैठक तहसील कार्यालय राजुरा येथे तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात सर्व बँक व्यवस्थापकांना शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठित करून देण्याचे आदेश दिले असून तालुक्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी नायब तहसीलदार किशोर साळवे, व्यवस्थापक एम.टी. सोनटक्के, व्यवस्थापक पी.बी. नगराळे, डी.जे. कालर, एम.बी. खामनकर, निशिकांत हौसस, कृषी अधिकारी दुर्वेश तुरजुले, एस.आर. मौदेकर व सहायक निबंधक राजुरा आदी उपस्थित होते.
सर्व शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे अशी भूमिका बँकांनी घ्यावी, असे तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे यांनी यावेळी दिले.
कोणत्याही शेतकऱ्यांकडून बँकांची तक्रार येणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य ती खातरजमा बँकांनी करून घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बँकांनी शेतकऱ्यांत जाणीव जागृती करावी, बँकांत येणारे सर्व अर्ज घेऊन त्यावर कार्यवाही करावी अशा सूचनाही दिल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले पाहिजे, अशी भूमिका बँकांनी ठेवावी. शेतकऱ्यांकडून कागदांची पूर्तता बँकांनी करुन घ्यावी. शेतकऱ्यांचा पीक विमा काढुन घ्यावा. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता नाही, अशाही शेतकऱ्यांनी पीक विमा करून घ्यावा तसेच पीक कर्जासाठी अडचणी असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आव्हान यावेळी करण्यात आले.
या बैठकीला तालुक्यातील विविध बँकाचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)