शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे पॅकेज द्या
By Admin | Updated: December 11, 2014 23:04 IST2014-12-11T23:04:40+5:302014-12-11T23:04:40+5:30
राज्यामध्ये अल्पप्रमाणात पाऊस पडल्यामुळे १९७२ पेक्षाही मोठ्या प्रमाणात भयावह अशी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. धान, सोयाबीन, कापूस आदी पिके पुर्णत: उद्धवस्त झाले

शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे पॅकेज द्या
चंद्रपूर : राज्यामध्ये अल्पप्रमाणात पाऊस पडल्यामुळे १९७२ पेक्षाही मोठ्या प्रमाणात भयावह अशी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. धान, सोयाबीन, कापूस आदी पिके पुर्णत: उद्धवस्त झाले असून शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी खरीप हंगामातील नुकसानीबाबत शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपये व रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना किमान २५ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेतील सभागृहात दुष्काळाच्या चर्चेवर बोलताना केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता शेतकऱ्यांची भूमिका आपणासमोर मांडत आहे. गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना दुष्काळी संकटाला समोर जावे लागत आहे. यावर्षी तर भयानक परिस्थिती आहे. अल्प पावसामुळे सोयाबीन, धान, कापूस, ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुबार तिबार पेरणी केली. परंतु अल्प पावसामुळे संपुर्ण पिके उदध्वस्त झालीत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सिंचनाअभावी वर्षातून फक्त एकदाच पिक घेण्यात येते. परंतु अल्प पावसामुळे याही जिल्ह्यातील पिके हातची गेल्याने नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना या चारही जिल्ह्यात घडत आहेत. हिच परिस्थिती कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या जिल्ह्यात सुद्धा असुन दररोज किमान तीन ते चार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गेल्या चार महिन्यात आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
उत्पादन कमी होऊनही भाव अल्पच
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तर यावर्षी कमी प्रमाणात उत्पादन होवून सुध्दा भाव मिळत नसल्याने शेतकरी पुर्णत: हवालदिल झालेला आहे. त्यामुळे धान, सोयाबिन, कापूस, ऊस या भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी. सोयाबिन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी.
तसेच सोयाबिन, धान, कापूस पिकविणाऱ्यांना खरीप हंगामासाठी ५० हजार रुपयांचे तर रब्बी हंगामासाठी २५ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात यावे. शेतकऱ्यांवर असलेले पीक कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. (प्रतिनिधी)