२२ दिवसानंतरही मुलींचा शोध नाही
By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:30:45+5:302014-12-25T23:30:45+5:30
औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून ३ डिसेंबर रोजी दोन मुली बेपत्ता झाल्या. २२ दिवसानंतरही या मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत.

२२ दिवसानंतरही मुलींचा शोध नाही
नांदाफाटा : औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून ३ डिसेंबर रोजी दोन मुली बेपत्ता झाल्या. २२ दिवसानंतरही या मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत.
३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गोवऱ्या वेचणीसाठी घराबाहेर पडलेल्या मुली सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यांनतर मुलीच्या आई- वडिलांनी दूरध्वनीवरुन नातेवाईकांना संपर्क केला. तसेच परिसरात शोध घेतला. मात्र दोन्ही मुलींचा पत्ता न लागल्याने शेवटी मुलींच्या आईवडिलांनी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर तात्काळ गडचांदूरचे ठाणेदार वंजारी यांनी पोलीस पथक सोबत घेऊन मुलींचा शोध घेणे सुरू केले.
मात्र तब्बल २२ दिवस उलटूनही मुलींचा पत्ता न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही मुली अल्पवयीन असून अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. यातील एक मुलगी गडचांदूर येथील झी- सेल या दुकानात काही महिने कामावर असल्याचेही समजते. घरी गॅस सिलिंडर नसल्याने गोवऱ्या गोळा करून आणाव्या लागतात. घटनेच्या दिवशी दोन्ही मुली गोवऱ्या गोळा करायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. गडचांदूरनजिक माणिकगड, अंबुजा हे दोन मोठे सिमेंट प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरात विविध राज्यातील नागरिकांचे जाणे- येणे असते. त्यामुळे मुलींचे कुणी पलायन तर केले नसेल ना, अशी शंका आहे.(वार्ताहर)