घुग्घुस, गोंडपिपरी, बल्लारपूर सोमवारपासून लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:01+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असून नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे व गरज नसताना घराबाहेर न पडणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यांमधील संख्या कमी करायची असल्यास संपर्कातून तयार होणारे रुग्ण कमी झाले पाहिजे.

घुग्घुस, गोंडपिपरी, बल्लारपूर सोमवारपासून लॉकडाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारपासून घुग्घुस, गोंडपिंपरी व बल्लारपूर या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११०५ बाधित पुढे आले आहे. सध्या ३७६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. ७१८ बाधितांना आतापर्यत सुटी मिळाली आहे. शुक्रवारी रात्री एका ६५ वर्षीय बल्लारपूर येथील महिलेचा मृत्यू झाला. तर रविवारी नगिनाबाग चंद्रपूर येथील एका ५४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील नऊ बाधितांचा आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असून नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे व गरज नसताना घराबाहेर न पडणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यांमधील संख्या कमी करायची असल्यास संपर्कातून तयार होणारे रुग्ण कमी झाले पाहिजे. त्यासाठी गृह अलगीकरणात असणाऱ्या नागरिकांपासून तर बाधित नागरिकांपर्यंत आपल्यापासून इतरांना बाधा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील तीन प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. बल्लारपूर, गोंडपिंपरी व घुग्घुस हे तीन शहर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस ग्रामपंचायतमध्ये रविवारपासून रात्री आठ वाजल्यापासून 20 ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, आस्थापना संपूर्णता बंद राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभराच्या वरती पोचली आहे. त्यामुळे सोमवार १७ ऑगस्ट पहाटेपासून २१ तारखेपर्यंत बल्लारपूर -बामणी बंद राहणार आहे. गोंडपिंपरीत कोरोनाने शिरकाव केला आहे. १६ ऑगस्टपासून २२ तारखेपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात २१ व २२ तारखेला फक्त जीवनावश्यक सेवा सकाळी ९ ते ते दुपारी २ पर्यंत सुरू राहील.
असे आहेत नवे बाधित
शनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक बाधित हे बल्लारपूर शहरातील आहेत. या शहरातील आतापर्यंत बाधिताची संख्या शंभरावर गेली. शनिवारी १५ बाधित पुढे आले आहे. चंद्रपूर महानगर बाधितांच्या संख्येत मागे नाही. या ठिकाणी ११ बाधित पुढे आले आहे. याशिवाय राजुरा आठ, चिमूर एक, वरोरा दोन, भद्रावती दोन, कोरपना तालुका एक व एक नागरिक तेलंगणा येथील रहिवासी आहे. रविवारी आढळलेल्या नव्या बाधितांमध्ये सर्वाधिक बाधीत हे राजुरा येथील असून राजुरा तालुक्यातून ११ बाधित पुढे आले आहे. त्यानंतर चंद्रपूर शहरातील रुग्ण वाढ कायम असून रविवारी १० बाधित पुढे आले आहे. तुकूम, ऊर्जानगर, रयतवारी कोलरी, पोलीस कॉटर परिसरातील हे रुग्ण आहेत. मूल येथील सहा बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या ११ नागरिकांपैकी नऊ बाधित जिल्ह्यातील आहे. या नऊ बाधितांपैकी मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये अन्य आजाराचे प्रमाण अधिक होते. कोरोनाशिवाय त्यांना अन्य गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.