कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर निघावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST2021-02-14T05:00:00+5:302021-02-14T05:00:57+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे कोविड-१९ पूर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज आहे. सतत मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर केला तरच कोविडपासून आपण सुरक्षित राहू शकू, असेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

Get out of the corona end mentality | कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर निघावे

कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर निघावे

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जि. प. सीईओ, पोलीस अधीक्षकांनी घेतली कोरोना लस

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :  कोरोना फ्रंटलाईन वर्कर म्हणून शनिवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदींनी शनिवारी शासकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे, लस घेतल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यत कुणालाही गंभीर रिॲक्शन झाले नाही. नोंदणीकृत फ्रंटलाईन वर्करने अफवांना बळी न पडता लस घ्यावी व कोरोना संपला, या मानसिकतेतून नागरिकांनीही बाहेर निघावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे कोविड-१९ पूर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज आहे. सतत मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर केला तरच कोविडपासून आपण सुरक्षित राहू शकू, असेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले. कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोज घेतला, काहीही त्रास झाला नाही, नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, लस देणारे आरोग्य सेवक प्रशिक्षित असल्याने कुठलाही त्रास झाला नाही. २८ दिवसांनी लसीकरणाचा दुसरा डोज दिला जाईल. त्यापुढे १४ दिवसानंतर कोरोनाच्या ॲन्टिबॉडीज शरीरात तयार होतील. ज्यांची नावे लसीकरण मोहिमेत समाविष्ट  आहेत, त्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लस टोचून घ्यावी. अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, लस अतिशय सुरक्षित आहे. मास्कचा वापर, हात धुणे व अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळूनच आपण कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकू शकतो. यावेळी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लस घेतली. आरोग्य सेविका चंदा डहाके या प्रशिक्षित आरोग्य सेविकेने सर्वांना लस दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, डॉ. राजेंद्र सुरपाम, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.
 

लसीकरणासाठी ७ हजार ७५५ जणांची नोंदणी 
जिल्ह्यातील ७ हजार ७५५ फ्रंटलाईन वर्कर्सची लसीकरणासाठी नोंदणी झाली. शुक्रवारपर्यंत ३ हजार ५९  जणांना लस देण्यात आली. यापूर्वी १२ हजार ९१ आरोग्य सेवकांना कोरोना लस देण्यात आली होती.

 

Web Title: Get out of the corona end mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.