गणेश मंडळांना घरगुतीपेक्षाही कमी वीजदर
By Admin | Updated: August 25, 2016 00:41 IST2016-08-25T00:41:22+5:302016-08-25T00:41:22+5:30
सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात...

गणेश मंडळांना घरगुतीपेक्षाही कमी वीजदर
अधिकृत वीज जोडणी घ्यावी : महावितरण कंपनीचे आवाहन
चंद्रपूर : सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात व ३ रुपये ७१ पैसे प्रति युनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रती युनिट ३ रुपये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर आहेत. हा दर घरगुती वीज दरापेक्षाही कमी आहे. त्यामुळे घरगुती किंवा वाणिज्यीक वीज जोडणीतून गणेश उत्सवासाठी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक उत्सवांकरिता अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोग्य सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीजदरापेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी २४ तास सुरू असणारे १८००२ ३३३४३५ किंवा १८००२ ००३४३५ या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, याशिवाय संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या त्या भागातील अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सार्वजनिक सुरक्षा महत्त्वाची
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवातील आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते. जवळच्या वीज खांबावरून किंवा वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका अधिक आहे.