सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मोर्चेबांधणी
By Admin | Updated: September 4, 2015 00:57 IST2015-09-04T00:57:55+5:302015-09-04T00:57:55+5:30
ग्रामीण भागातील राजकारणाला दिशा देणारी व ग्राम विकासाला चालना देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका महिन्यापूर्वी घेण्यात आल्या.

सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मोर्चेबांधणी
बल्लारपूर : ग्रामीण भागातील राजकारणाला दिशा देणारी व ग्राम विकासाला चालना देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका महिन्यापूर्वी घेण्यात आल्या. बल्लारपूर तालुक्यात १७ पैकी १० ग्रामपंचायतीत नवीन सदस्य निवडून आले. हा सर्वात मोठा टप्पा आहे. यामुळे ग्रामीण भागातले राजकारण ढवळून निघाले. तहसील प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आता ग्रामीण भागातील राजकारणाने वेग घेतला असून सरपंच व उपसरपंच पदावर आपल्याच पक्षाचे उमेदवार बसावे म्हणून गावपातळीवरील राजकारण्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, मानोरा, पळसगाव, आमडी, कळमना, गिलबिली व किन्ही येथील ग्रामपंचायतीची मुदत ६ ते १६ सप्टेंबर दरम्यान संपत आहे. यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत नवीन सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होणे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगाने तहसील प्रशासनाने २६ मार्च रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी जातीनिहाय आरक्षण सोडत काढली होती. याच आरक्षण धोरणानुसार सरपंचपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. गाव पातळीवर सरपंचपदाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
नांदगाव (पोडे), कोर्टिमक्ता व मानोरा येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ७ सप्टेंबरला घेण्यात येत आहे. हडस्ती ग्रामपंचायतीत ८ सप्टेंबर, पळसगाव व आमडी येथे ११ सप्टेंबर, विसापूर १४, कळमना व गिलबिली येथे १५ तर किन्ही ग्रामपंचायतीमध्ये १७ सप्टेंबरला सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक आयोजित करण्यात आली आहे. नांदगाव (पोडे) व पळसगाव येथे सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. विसापूर येथे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे. हडस्ती व गिलबिली येथे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
किन्ही व कळमना ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. आमडी व मानोरा येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. कोर्टिमक्ता येथे सर्वसाधारण महिला सरपंचपद राखीव आहे. यामुळे गावपातळीवरील राजकारणी आपल्या गटातील सदस्याला सरपंचपदाची खुर्ची मिळावी म्हणून मोर्चे बांधणीच्या कामाला सुरूवात केली आहे. यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची मनधरणी करण्याचे धोरण अवलंबविण्यात आले आहे.
तालुक्यात सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आले आहे. यामुळे गावगाड्यातील राजकारणाने वेग घेतला आहे. काही ठिकाणी सदस्यांनी आपल्या बाजुने मतदान करावे, म्हणून सदस्यांची अज्ञातस्थळी रवानगी केली आहे. काहींना धार्मिकस्थळाची मेजवानी मिळत आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत केंद्रस्थानी असल्यामुळे व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यापेक्षा सरपंच पदाला झुकते माप मिळत असल्याने सरपंचपदाची निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. या दृष्टीकोनातून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यासाठी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विसापूर येथे १७, नांदगाव (पोडे) येथे ११, पळसगाव येथे ९, कळमना येथे ९, मानोरा येथे ९, गिलबिली येथे ९, हडस्ती येथे ७, आमडी येथे ७, कोर्टिमक्ता येथे ७ व किन्ही ग्रामपंचायतमध्ये ७ असे एकूण १० ग्रामपंचायतीत नवीन ९२ सदस्य निवडून आले. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत यातील १० जणांना सरपंच व १० जणांना उपसरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.