चार महिन्यात पेट्रोल-डिझेलसह सिलिंडर१२५ रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:48+5:302021-02-11T04:29:48+5:30
चंद्रपूर : मागील चार महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या भावात दरवाढ होत आहे. त्यामुळे महागाईमुळे सामान्य नागरिक ...

चार महिन्यात पेट्रोल-डिझेलसह सिलिंडर१२५ रुपयांनी महागले
चंद्रपूर : मागील चार महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या भावात दरवाढ होत आहे. त्यामुळे महागाईमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. सामान्यांच्या आवश्यक असलेल्या वस्तूंचीच दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. चार महिन्यामध्ये पेट्रोलचे चार रुपये ९५ पैशांनी तर डिझेल सात रुपये १५ पैशांनी महागले आहे. सिलिंडरच्या किमती १२५ रुपयांनी वाढल्या आहेत. परिणामी सर्वच साहित्याच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे.
एकीकडे पेटोल, डिझेलच्या किमती वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने एप्रिल २०२० पासून घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम कपात करणे सुरू केले आहे. १२५ रुपयाने गॅस सिलिंडर महागला आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही चांगलेच कंबरडे मोडले आहे.
कोरोना काळात रोजगार गेल्याने खिशामध्ये पैसा नाही. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने प्रवासही महागला आहे. प्रत्येक गोष्टींची खरेदी करताना महागाईचा सामना करावा लागत आहे. दर वाढल्यामुळे ऑटो तसेच प्रवासी साधनांचेही दर भडकले आहे. त्यामुळे महागाईमध्ये सामान्य नागरिक चांगलाच पिचल्या जात आहे. थेट खिसा रिकामा होत असल्यामुळे केंद्र सरकारवर सामान्य नागरिकांचा रोष बघायला मिळत आहे.
कोट
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, एवढेच नाही तर सिलिंडरचीही दरवाढ केली आहे. यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. दिलेले आश्वासनही केंद्र सरकारने पाळले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे.
-सुरेश मडावी
चंद्रपूर
--
अनुदानामध्ये कपात करून सिलिंडरचे दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना गॅसवर स्वयंपाक करणे परवडणारे नाही. उज्ज्वला योजनेमधील अनेक ग्राहक आता चुलीवर स्वयंपाक करीत आहे. त्यामुळे शासनाने सिलिंडरची दरवाढ कमी करून सामान्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
-रिमा खलटे
गृहिणी,चंद्रपूर
---
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम थेट अन्य वस्तूंवरही होत आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी पेटोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करणे आवश्यक आहे.
नितीन घरोटे
चंद्रपूर