संपर्क तुटणाऱ्या गावांत चार महिन्यांचे धान्य पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:03 IST2017-07-21T01:03:55+5:302017-07-21T01:03:55+5:30
दरवर्षी रस्ते व पूर परिस्थतीमुळे संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील १३ गावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पोहचविले जाते.

संपर्क तुटणाऱ्या गावांत चार महिन्यांचे धान्य पोहोचले
रस्ते व पूर परिस्थितीचा धसका : पुरवठा विभागाची सर्तकता
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दरवर्षी रस्ते व पूर परिस्थतीमुळे संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील १३ गावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पोहचविले जाते. यावर्षी ११ गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले असून उर्वरीत दोन गावांना लवकरच धान्य पुरवठा केला जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.
संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटत असते. तर काही गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने वाहनाने धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पोहोचविले जाते. जिल्ह्यात अशी १४ गावे असून आतापर्यंत ११ गावांना चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले आहे.
संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील वढा, आरवट, शिवणी चोर, पायली भटाळी, राजुरा तालुक्यातील कोलगाव, भद्रावती तालुक्यातील पारोधी, कोची घोनाड, गोंडपिंपरी तालुक्यातील कुलथा, पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव टोक, गंगापूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, बल्लारपूर तालुक्यातील चारवट, हडस्ती कोरंबी गावांचा समावेश आहे. यापैकी भद्रावती तालुक्यातील पारोधी, कोची घोनाड या दोन गावांना धान्य पुरवठा झालेला नाही.
येत्या दोन-चार दिवसांत या गावांनाही चार महिन्यांचे धान्य पुरवठा केला जाईल, असे पुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांची धान्याची समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे.
१३ गावांतील ८ हजार ५३७ लाभार्थी
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १३ गावांची लोकसंख्या ८ हजार ५३७ असून या सर्व गावांत ३५० एपीएल शिधापत्रिकाधारक, ६२७ अंत्योदय तर १ हजार प्राधान्य कुटूंबाचे शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना १६७८ क्विंटल गहू तर १७५० क्विंटल तांदूळ असा ३४२९.३ क्विंटल धान्य पोहचविण्यात येणार आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक धान्य पोहचविण्यात आले आहे.
पूर परिस्थितीमुळे व रस्त्यांच्या दुरवस्थेने जिल्ह्यातील १३ गावांत धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे या गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पावसाळ्यापुर्वीच पोहचविले जाते. ११ गावांना धान्य पुरवठा करण्यात आले असून उर्वरीत गावत लवकरच धान्य पोहचणार.
- आर. आर. मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.