वनविभागाचा प्रयोग वन्यप्राण्यांवर ‘लय भारी’
By Admin | Updated: December 18, 2014 22:53 IST2014-12-18T22:53:07+5:302014-12-18T22:53:07+5:30
वन्यप्राण्यांकडून धान व इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीपासून बचाव करण्याकरिता उपाययोजनांचे प्रात्याक्षिक क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी वनउपक्षेत्र केळझर अंतर्गत

वनविभागाचा प्रयोग वन्यप्राण्यांवर ‘लय भारी’
पोंभुर्णा : वन्यप्राण्यांकडून धान व इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीपासून बचाव करण्याकरिता उपाययोजनांचे प्रात्याक्षिक क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी वनउपक्षेत्र केळझर अंतर्गत अधिनस्त असलेल्या गावांमध्ये करून दाखविले. त्यांचे अनुकरण परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये केले. यामध्ये देवाडा खुर्द, दाबगाव, जामखुर्द येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असुन वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांच्या होणाऱ्या नुकसानीला संरक्षण मिळाले आहे.
दरवर्षी रानटी डुक्कर व इतर वन्यप्राण्यांच्या हैदोसाने धान व इतर पिकांची नासधूस होवून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. त्यामुळे शासनाला सुद्धा लाखो रुपये नुकसान भरपाई द्यावी लागायची. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केळझर उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी वन्य प्राण्यांना हाकलून लावण्यासाठी आणि शेतमालाचे बचाव करण्यासाठी विनाखर्चाचे व घरगुती वापरातील वस्तुंचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
गोणपाट, काठी व वाळलेली साबन, मिरची याचा वापर करून त्याचा टेंबा तयार केला. सायंकाळच्या वेळी टेंब्यावर रॉकेल ओतून आग लावावी व शेताच्या सभोवताल वास पसरेल याप्रमाणे टेंबा फिरवावा. त्यानंतर दुसऱ्या उपाययोजनेत गोणपाट तेल किंवा खराब आॅईलमध्ये बुडवून त्यावर तिखटाची भुकटी दोन काठ्यांच्या सहाय्याने शेताच्या जंगलाकडील भागाकडे टांगून ठेवावी. तर तिसऱ्या उपाय योजनेत ओल्या शेणामध्ये वाळलेली मिरची व रेतीचा वापर करून गोवऱ्या तयार कराव्या. त्या गोवऱ्या वाळल्यावर सायंकाळच्या वेळेस शेताच्या धुऱ्यावर पेटवून धूर करावे. असे उपाय सतत आठ ते दहा दिवस केल्यास रानटी डुक्कर व इतर वन्यप्राणी शेतपिकांची हानी करणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रात्याक्षिक मार्गदर्शन घेतलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये प्रयोग करून पाहिले. त्यात त्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)