विकास कामांत वनविभागाचे अडथळे ; सिंचनाचा प्रश्न
By Admin | Updated: December 14, 2015 01:17 IST2015-12-14T01:17:54+5:302015-12-14T01:17:54+5:30
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर, मूल व पोंभूर्णा या तालुक्यांचा तसेच चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम या क्षेत्रातील काही भागाचा समावेश आहे.

विकास कामांत वनविभागाचे अडथळे ; सिंचनाचा प्रश्न
वसंत खेडेकर बल्लारपूर
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर, मूल व पोंभूर्णा या तालुक्यांचा तसेच चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम या क्षेत्रातील काही भागाचा समावेश आहे. या विधानसभेचा भाग औद्योगिक, कृषी आणि वनक्षेत्राने व्यापला असल्याने कृषी आणि वनजमिनीचे प्रमाण बरेच आहे. म्हणून त्या संबंधात समस्याही तेवढ्याच आहेत.
सिंचनाबाबत या विधानसभा क्षेत्रातील स्थिती समाधानकारक नाही. या विधानसभेत धान उत्पादक पट्टा अधिक आहे. सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने कास्तकारांना निसर्गाच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. निसर्गाने साथ दिली तर ठीक अन्यथा धानपिक बुडतो. यंदा हीच स्थिती आहे. जवाहर सिंचन विहिरी, कोल्हापुरी बंधारे आदींच्या माध्यमातून शासन सिंचनाच्या सुविधा निर्माण करीत आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होत असल्याचे दिसत नाही. तलाव आहेत पण त्यात बारमाही पाणी असणारे तलाव किती, हा एक प्रश्नच आहे.
बरेचसे तलाव उथळ झाले आहेत. त्यांचे खोलीकरण आवश्यक आहे. तरच पाणी साठवून कास्तकारांच्या, गुरा ढोरांच्या कामी ते येथील. सिंचनाकरिता काही प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. ते पूर्ण झाले तर सिंचनाची व्यवस्था होऊन धानपट्ट्याला बरकत मिळू शकते. मात्र, ते प्रकल्प पूर्ण होण्याकरिता वनविभागाची आडकाठी येत आहे.
कोठारी जवळील हतीगोटा वनक्षेत्रातून नाला वाहतो. या नाल्यावर बंधारा बांधल्यास त्याचा फायदा सुमारे अडीचशे हेक्टर शेतीला होवू शकतो. याच परिसरात गोटाडी हा नाला आहे. त्याचाही उपयोग, बंधारा बांधून सुमारे दीडशे हेक्टर शेतीला होईल. पण, वनविभागाची या बंधारा बांधण्याला अडचण येत आहे. कितीतरी वर्षापासून या बंधाऱ्याचा प्रश्न रेंगाळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री आहेत. हत्तीगोटा व गोटाडी बंधाऱ्याचा प्रश्नाची त्यांना जाण आहे. ते वनमंत्री असल्याने वनविभागाचा अडथळा दूर होईल, अशी आता आशा निर्माण झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी सिंचन योजना रखडली आहे. त्याचाही मार्ग मोकळा होणे गरजेचे आहे.
सिंचनाचा मोठा प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेल्या गोसीखुर्द धरणापासून आपणाला पाटाद्वारे पाणी मिळणार व भातशेती संपन्न होणार, अशी आशा मूल क्षेत्रातील शेतकऱ्यांना कितीतरी वर्षापासून लागली आहे. पण, गोसीखुर्द या भागातील कास्तकारांना ‘बिरबल की खिचडी’ सिद्ध होत आहे. वैनगंगा नदीवर हरणघाट सिंचन योजना कार्यरत आहे. पण, त्याचे पाणी राजगड, गवराळा, बोरचांदली, फिस्कुटी, चांदापूर, जुना सुर्ला या सहा गावापर्यंतचे जाते. पुढे इतरही गावातील शेतजमिनीला याचे पाणी मिळावे याकरिता या सिंचन योजनेचा विस्तार करावा, अशी कास्तकारांची मागणी आहे.
मूल-भेजगाव या महत्त्वाच्या मार्गावरील उमा नदीवर बांधलेला पूल खचला असून पावसाळ्यात त्यामुळे मार्ग बंद होतो. यामुळे, पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. बल्लारपुरात रविंद्रनगर, मौ.आजाद, राजेंद्र प्रसाद आणि पं. दिनदयाल हे चार वार्ड वनजमिनीवर वसले आहेत. तेथील रहिवाशांना जमिनीचे पट्टे मिळावे जेणेकरून शासकीय योजनांचा या भागाला फायदा होईल. बल्लारपूर शहराच्या विस्ताराकरिता वनजमिनीला आबादी जमीन म्हणून करणे आवश्यक आहे. बामणी-पावर हाऊस बायपास रोड वनविभागाच्या अडथळ्यात अडकला आहे.