पाचगावच्या बांबूसंदर्भात वन विभागच संभ्रमात

By Admin | Updated: May 8, 2014 01:53 IST2014-05-08T01:53:01+5:302014-05-08T01:53:01+5:30

हल्ली वनविभागात काय चाललेयं हे कुणालाच कळायला मार्ग नाही. खुद्द वनविभागातील अधिकार्‍यांनाही काय करावे आणि काय नको हे कळनासे झाल्यासारखे वागताना दिसत आहे.

The forest department is confused about a five-point bundle | पाचगावच्या बांबूसंदर्भात वन विभागच संभ्रमात

पाचगावच्या बांबूसंदर्भात वन विभागच संभ्रमात

चंद्रपूर : हल्ली वनविभागात काय चाललेयं हे कुणालाच कळायला मार्ग नाही. खुद्द वनविभागातील अधिकार्‍यांनाही काय करावे आणि काय नको हे कळनासे झाल्यासारखे वागताना दिसत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव ग्रामसभेतील घटनेमुळे सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र वनविभागाची स्थिती मात्र जंगलराजसारखी झाली आहे.
चंद्रपूरच्या मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणार्‍या पाचगावला अनुसूचित जाती जमाती व अन्य पारंपारिक वन निवासी अधिनियम-२00६ नुसार सामूहिक वनअधिकाराचा दावा मंजूर झाला होता. या अधिनियमानुसार, या गावच्या ग्रामसभेला बांबू कटाई आणि गौण उपज संकलनाचे अधिकार मिळाले होते. त्या आधारावर ग्रामसभेने यंदा बांबू कटाईसुद्धा केली होती. मात्र, बांबू कटाईमध्ये नियमांचे पालन न केल्याचा आरोप लावून वनविभागाने प्रारंभी अज्ञात लोकांविरूध्द प्राथमिक गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर यात पाचगाव ग्रामसभेला गुंतवून गावकर्‍यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, आज बुधवारी वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी या गावात जाऊन कापलेला बांबू जप्त केला. त्यांनतर उपवनसंरक्षकांचे आदेश आल्याचे सांगत ही जप्ती थांबविली. वनविभागाच्या या वागण्यामुळे गावकरी आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. बांबू कटाईचा अधिकार देऊनही गावाला दोषी कसे काय ठरविता, असा गावकर्‍यांचा प्रश्न आहे.
वनविभागाचे अधिकारी ही कारवाई आपल्या मर्जीनेच करीत असल्याचा पाचगाववासियांचा आरोप आहे. बांबू कटाईचा अधिकार सरकारनेच दिला असल्याने त्यात काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी सांगता आले असते. मात्र त्याऐवजी चक्क बांबूच्या जप्तीची आणि कारवाई करण्याची प्रक्रिया केल्याने गावकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामसभेला स्वतंत्र दर्जा असल्याने या अधिकार्‍यांवर कारवाई का केली जाऊ नये, असा पवित्रा घेण्याच्या विचारात ही ग्रामसभा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)


ही कारवाई तेथील गावकर्‍यांच्या मनमानीमुळे करण्यात आली आहे. त्यांना मिळालेला सामूहिक वन अधिकार नियमानुसार काम करण्यासाठी होता. मात्र, त्यांनी बांबू कटाई अवैधपणे केली. त्यामुळेच गुन्हा नोंदविण्यात आला होता. बांबू कटाईच्या गुन्ह्याची कबुलीही गावकर्‍यांनी दिली आहे. त्यामुळेच पथक बांबूच्या जप्तीसाठी गेले होते. मात्र विभागीय वनअधिकार्‍यांचा आदेश आल्याने जप्तीचा बांबू परत करण्यात आला.
-डी.एम. उके
कोठारी वन परिक्षेत्राधिकारी

Web Title: The forest department is confused about a five-point bundle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.