फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 00:57 IST2016-04-11T00:57:07+5:302016-04-11T00:57:07+5:30
पाणी म्हणजे जीवन आहे. परंतु ते पाणी तितकेच शुद्ध असायला हवे, पाण्यामुळेच तहानलेला जीव शांत होतो.

फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दात झाले पिवळे : वारंवार ओरड करूनही प्रशासन ढिम्म
प्रकाश काळे गोवरी
पाणी म्हणजे जीवन आहे. परंतु ते पाणी तितकेच शुद्ध असायला हवे, पाण्यामुळेच तहानलेला जीव शांत होतो. मात्र चिंचोळी (खुर्द) येथील पाणीच फ्लोराईडयुक्त असल्याने गावकऱ्यांना नेहमीच कोणता ना कोणता आजार जडतो. फ्लोराईडयुक्त पाणी पिणेच नागरिकांच्या नशिबी आले असून याच पाण्यावर चिंचोलीवासीयांना आपली तहान भागवावी लागत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे दात पिवळे झाले असून आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वारंवार ओरड करूनही प्रशासनाकडून दखलच घेतली जात नसल्याने आता दाद कुठे मागावी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
राजुरा तालुक्यापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेले चिंचोली (खुर्द) पूर्वीपासूनच तसे दुर्लक्षित गाव. गावाकडे जाणाऱ्या रस्त्याअभावी या गावाकडे फारसे प्रशासकीय यंत्रणेच लक्ष गेले नाही. त्या काळातच चिंचोली गावाला शिक्षणाची गंगोत्रीच मिळाल्याने हे गाव शिक्षण क्षेत्रात अधिकच प्रकाशझोतात आले. मात्र गावकऱ्यांना अपेक्षित असलेला गावाचा विकास झाला नाही. तब्बल १५ ते १६ वर्षापूर्वी गावातील जलस्त्रोत आटल्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यावरच लाखो रुपये खर्च करुन पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यासाठी पाणीपुरवठ्याची बोअरवेल गोवरी येथील एका शेतात खोदण्यात आली. या बोअरवेलमधून चिंचोली (खुर्द) आणि निंबाळा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु भूमिगत पाईपलाईनचे अंतर जास्त लांब असल्याने पाईप लाईन जागोजागी लिकेज झाली. यानंतर पाईपलाईन दुरुस्तीचे काम झाले. बोअरवेल गोवरीला, पाणी पुरवठ्याची टाकी चिंचोली येथे आणि पाणी निंबाळा आणि चिंचोली गावाला पुरविणे म्हणजे दिव्यच. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना फार काळ तग धरु शकली नाही. या योजनेत शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी झाली. मात्र गावकऱ्यांना पाण्याचा थेंबही मिळाला नाही.
आजघडीला चिंचोली येथे बहुतांश गावकऱ्यांकडे घरगुती बोअरवेल आहे. गावात सरकारी हातपंप आहे. विहिरी आहेत. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या पूर्णपणे आटल्या आहेत. चिंचोली येथील पाणी हे फ्लोराईडयुक्त आहे. पाणी शुद्ध असेल तर माणसाचे आरोग्य चांगले राहते. मात्र गावकऱ्यांना फ्लोराईडयुक्त पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दोन वर्षापूर्वी येथे जलशुद्धीकरणाची छोटेखानी टाकी लावण्यात आली. परंतु ग्रामपंचायतीचे नियोजन चुकल्याने गावकरी शुद्ध पाणी पिण्यापासून वंचित राहिले. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे आजही येथील नागरिकांना सांधेदुखी, डोकेदुखी, यासारख्या अनेक व्याधी जडल्या आहेत. नागरिकांचे दातही पिवळे आहेत. याच गावात २०१० मध्ये तापाच्या साथीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गावात ठाण मांडले होते. गावातील घाणीचे साम्राज्य आणि फ्लोराईडयुक्त दुषित पाणी हेच गावकऱ्यांच्या जिवावर उठल्याने अनेक गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता. गावाच्या मुख्य रस्त्यावरच आजही घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढिग पसरले आहे. २०१० ची पुनरावृत्ती पुन्हा तर होणार नाही ना, अशी भीती गावकऱ्यात आहे. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी नालीचा उपसा केला नाही. या गावात गेल्या अनेक वर्षापासून पाणीपुरवठा नळ योजना नाही. गावात नळ योजना यावी ही नागरिकांची जुनी मागणी आहे, हे विशेष.