वैनगंगा नदीला पूर, दोन गावात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:57+5:30
तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव(भो.), चिखलगाव गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

वैनगंगा नदीला पूर, दोन गावात पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत असल्यामुळे अनेक शिवारात पाणी जमा झाले आहे. तालुक्यतील पिंपळगाव व चिखलगावात पुराचे पाणी शिरले आहे.
तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव(भो.), चिखलगाव गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
पुराचा फटका नदी काठावर असलेल्या अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव(भो.), भालेश्वर, चिखलगाव, सोंद्री, चिंचोली, सावलगाव, सोनेगाव, बोळेगाव, खरकाडा, रणमोचन, पिंपळगाव(ख), चिचगाव, आवळगाव, हळदा शिवारातील पिकांना बसला आहे.
सोबतच गांगलवाडी-आवळगाव या मार्गावरून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने तो मार्ग बंद झालेला आहे. नदीकाठावर असलेला पिंपळगाव(ख) या गावाचासुध्दा इतर गावांशी संपर्क तुटला असून गावाबाहेर जाणाऱ्या मार्गांवर पुराचे पाणी वाहत आहे.
सतत वाढत असलेल्या पाण्याच्या पातळीमुळे १९९४ च्या पुरासारखी स्थिती निर्माण होते की काय, अशी भीती नदीकाठाजवळ असलेल्या गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पुराचे पाणी शिवारात शिरल्याने खरीप हंगामातील धान व इतर पिके, भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करण्याची मागणी आहे.
लाडजवासीयांचा संपर्क तुटला
वैनगंगा नदी तुडुंब भरून दुथडी वाहत असल्याने पुलाअभावी लाडजवासीयांचा मागील कित्येक दिवसांपासून तालुक्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज हे गाव वैनगंगा नदीपत्राच्या मधोमध वसलेले असून चारही बाजूंनी नदीपात्राने व्यापलेले असल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गंगालवाडी-ब्रम्हपुरी मार्ग बंद
गांगलवाडी : या भागात सतत चार दिवस पाऊस झाल्यामुळे गांगलवाडी ते ब्रम्हपुरी मार्गात असलेल्या नाल्याला पूर आला आहे. त्याचे पाणी पुलावरून वाहायला लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली असून हा मार्ग बंद झाला आहे. तसेच या भागातील बऱ्याच शेतकºयांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.