तंटामुक्त करंजीत दारुचा महापूर

By Admin | Updated: September 1, 2015 00:46 IST2015-09-01T00:46:30+5:302015-09-01T00:46:30+5:30

तंटामुक्त मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कारप्राप्त करंजी गावात सद्यस्थितीत अवैध दारुचा महापूर वाहत असल्याचे चित्र आहे.

Flood-free Karanjit drunkenness | तंटामुक्त करंजीत दारुचा महापूर

तंटामुक्त करंजीत दारुचा महापूर

सामाजिक कार्यकर्त्यांची चुप्पी : पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गोंडपिंपरी : तंटामुक्त मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कारप्राप्त करंजी गावात सद्यस्थितीत अवैध दारुचा महापूर वाहत असल्याचे चित्र आहे. मात्र या अवैैध दारुविक्रीवर आळा घालायचा कसा, असा यश प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. मात्र ती दारुबंदी केवळ कागदोपत्री झाल्याचे चित्र तालुक्यासह जिल्ह्यात आहे. मग याला करंजी गाव अपवाद कसा राहील. करंजी गावातदेखील छुप्प्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा पुरवठा होत असून राजरोसपणे दिवसाढवय्या दारुविक्री केली जात आहे. चौकाचौकात सायंकाळच्या सुमारास बाजार भरल्यासारखे चित्र बघायला मिळत आहे. मात्र यावर सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनीही चुप्पी साधली असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परिणामी गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका होण्याइतपत विदारक परिस्थिती आहे. अवैध दारुविक्रेत्यांची संख्या २० च्या आसपास असून त्यात अनेक उच्चशिक्षित युवकांचाही समावेश आहे. एकेकाळी करंजी गावच्या तंटामुक्त गाव समितीच्या कार्याचे जिल्ह्यात नाव होते. समितीच्या कार्याचा गौरव केला जायचा. अवैध दारुविक्रीला आळा घालण्यासाठी समितीने विविध उपाययोजना केल्या. परिणामी अवैध दारुविक्रीला लगाम लागला. गुटखा बंदी यशस्वी ठरली. काळ्या धंद्यांना आळा बसला. याचीच फलश्रृती म्हणून गावाला तंटामुक्त मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार मिळाला. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
राज्य शासनाने दारुबंदीची घोषणा करताच अवैध दारुविक्रेत्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. गावविकासाच्या साऱ्याच पर्यायांना काळे फासत अवैध दारुविक्रीसारखे व्यवसाय चालविल्याने गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. आज गावात कोणीकोणाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. यातच करंजी-जोगापूर गटग्रामपंचायत असलेल्या या दोन्ही गावाच्या शांतता व व्यवस्थेसाठी दोन स्वतंत्र पोलीस पाटील असतानादेखील त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून यावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालविले जाण्याची गरज आहे. मात्र तसेच होताना दिसून येत नाही. यावरुन पोलीस प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज असून त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे. (तालुुका प्रतिनिधी)

Web Title: Flood-free Karanjit drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.