जोगापूरमध्ये दारूचा महापूर
By Admin | Updated: December 21, 2015 01:04 IST2015-12-21T01:04:35+5:302015-12-21T01:04:35+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील जोगापूर गावामध्ये ...

जोगापूरमध्ये दारूचा महापूर
पोलिसांचे असभ्य दुर्लक्ष : संध्याकाळी गावात भरते मद्यपींची जत्रा
आक्सापूर : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील जोगापूर गावामध्ये अवैध दारू विक्रीला उधाण आले असून गावात अक्षरश: दारूचा महापूर वाहत आहे.
गोंडपिपरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेवटच्या टोकावर असलेले जोगापूर या गावात दारू विक्रीमुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना दारू पिणाऱ्यापासून त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. दारूबंदीनंतर काही काळ अनेकांच्या संसाराचा गाडा रूळावर आला होता. मात्र काही दिवसातच हे चित्र पालटून गेले. दारू तस्कर अवैध दारूच्या तस्करीत उतरले आणि गावागावांत दारूचे पाट वाहू लागले. त्यातून जोगापूर गावदेखील सुटले नाही. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होणाच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अवैध दारू विक्रीवर आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असतानाही पोलीस चुप्पी साधून असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना मिळालेली गुप्त माहिती दारूविक्रेत्यापर्यंत पोहचते कशी, हा सर्व प्रकार पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या अवैध दारू व्यवसायात जास्त प्रमाणात बेरोजगार युवक सहभागी असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील युवक कमी श्रमात दाम दुपटीने रोजगार मिळाल्याने अन्य कामे सोडून दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे सामाजिक आरोग्य बिघडत चालल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. दारूबंदीनंतर गावात शांतता तंटे-भांडण कमी झाले. गुण्यागोविंदाने नागरिक एकमेकांसमोर वागू लागले. रस्त्यावर दारू पिवून डोलणारे कमी झाले. महिलाही सुरक्षित दिसून येत होत्या. परंतु दारूमुळे परिस्थिती बदलली. रोज संध्याकाळी परिसरातील दारू पिणारे अनेकजण पायदळी तर काहीजण दुचाकी वाहनाने जोगापुरात येतात. संध्याकाळी गावात जत्रेचे स्वरूप तयार होते. पिणाऱ्यामध्ये भांडणेसुद्धा झाली असून पोलिसांपर्यंत प्रकरण गेले आहेत. दारूच्या नशेत आपआपल्या गावाकडे जात असताना भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहे. त्यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,जवळच्या तेलंगणा राज्यातून दारू येत असल्यामुळे दारूवरील झाकणावर नाव लेबल नसल्याने ही दारू बनावट असल्याची चर्चा दारू पिणाऱ्यामध्ये होत आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जोगापूर जवळील आक्सापूर गावापासून कोठारी पोलीस ठाण्याची सीमा चालू होते. दारूमुळे या आक्सापूर गावामध्ये जादूटोणा भांडण तंट्याचे प्रकार वाढून असे अनेक प्रकरण कोठारी पोलीस ठाण्यामध्ये गेले. कोठारीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांनी वेळीच दखल घेवून रोज संध्याकाळी दारू आणणाऱ्यांवर व पिवून येणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)